मुख्य सामग्रीवर वगळा

आता इंटरनेट अडिक्शनची भीती


वकरच भारतामध्ये ५ जी इंटरनेट सुविधा सुरू करण्यासाठी हालचाली होत असल्याचे वृत्त आले आहे. भारतात इंटरनेटचा प्रसार झपाटयाने होत आहे. प्रतीदिन १.५ जीबी इंटरनेट सुविधा अत्यल्प दरात भेटत असल्याने भारतीय तरूणांना बेरोजगारीची जाणिव होत नसल्याचे मागे कुठेतरी माझ्या वाचनात आले होते. ही बाब वास्तविकतेपासून तरूणांना दूर करणारी आणि गंभीर आहे. भारतीय तरूणांमध्ये एकीकडे बेरोजगारी वाढत चालली आहे तर दूसरीकडे मोठया संख्येने तरूण इंटरनेट अडिक्शनकडे वाटचाल करित आहेत. सध्या देशाची एक मोठी संख्या स्मार्टफोन, इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या साइबर अडिक्शनची शिकार झाली आहे. यामुळे युवकात बेरोजगारी तसेच देशाच्या वास्तविक समस्यांच्या प्रती विचार करण्याची आणि त्यांना समजून घेण्याची क्षमता संपत आहे. इंटरनेट अडिक्शने केवळ भारतच नाही तर जगातील अनेक देश आता त्रस्त झाले आहेत.
नुकतेच कैंब्रीज एनालिटिका कंपनीने फेसबुक वरिल डेटा लीक करून याचा वापर डोनाल्ड ट्रंप यांना विजयी करण्यासाठी केल्याची बाब समोर आली. तरूणांमधील इंटरनेट अडिक्शनचाच फायदा या कंपनीने घेतला.तरूणांचे व्यक्तीगत आकडे आता एखादया व्यक्तीला अथवा कंपनीला विकले जावू शकतात.
भारतीय तरूण स्मार्टफोनशिवाय असे बैचेन होतात जसा शरीराचा एखादा अंग नाहीसा झाला आहे ही अवस्था प्रत्येक ५ भारतीय तरूणांमागे ३ मध्ये असल्याचे एका सर्वेमध्ये समोर आले आहे. सायबर अडिक्शनची शिकार झालेल्यांमध्ये वय १८ ते ३० मधिल तरूणांची संख्या जास्त आहे. यापैकी ९६ टक्के तरूण सकाळ होताच सोशल साईटसना भेट देतात तर ७० टक्के तरूणांचे असे म्हणने आहे की,ते सोशल मीडिया आणि इ-मेल चेक केल्याशिवाय जगू शकत नाहीत. ए.टी.कियर्नी या कंपनीने दहा देशांच्या १० हजार लोकांमध्ये केलेल्या एका सर्वेनूसार ५३ टक्के भारतीय प्रत्येक तासाला इंटरनेटला जुडून राहत असल्याची बाब समोर आली आहे जी जागतीक सरासरीच्या ५१ टक्के आहे. देशातील या डिजीटल नशाखोरीला आपण आपल्या आसपासच नाही तर घरामध्येही अनुभवू शकतो. लोकांना आता आभासी जगातील मित्र बनवण्याचे असे व्यसन लागले आहे की वास्तविक जीवनातील नाती दृढ करणे आता कठिण झाले आहे. व्यक्ती जेंव्हा आपल्या कामाकडे दूर्लक्ष करून स्मार्टफोनमध्ये गुंतत असेल तर समजा की, ही या व्यसनाची सूरूवात आहे. इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे जग हे छोटे झाले आहे आणि माहितीची देवाण-घेवाण अत्यंत वेगाने होत आहे ही जरी सकारात्मक बाब असली तरी याच्या अती वापर सायबर अडिक्शनला कारण बनत आहे. माहीतीचा वेग एवढा वाढला आहे की, युवकवर्ग या ओझ्याखाली दबला जात आहे त्यामुळे त्यांची विचार करण्याची आणि समजण्याची क्षमता कमी होत चालली आहे. ते सतत स्मार्टफोन मध्ये गुंतून राहत असल्याने कामाकडे साहजिकच दूर्लक्ष होते. प्रसिद्ध लेखक निकोलस कार यांनी मानवी मेंदूवर इंटरनेटच्या प्रभावावर लिहिलेल्या दि शैलोज या पुस्तकात म्हटले आहे की, इंटरनेट आपल्याला तणावग्रस्त,चिडचिडे बनवते, ते आपल्याला अशा अवस्थेकडे घेवून जाते जिथे आपण सर्वस्वी त्याच्यावरच अवलंबून राहतो.

जागतीक मजूर संघटनेच्या ताज्याअहवालानूसार २०१९ पर्यंत भारतात बेरोजगारांची संख्या १.८९ कोटी होईल. २०१७ मध्ये भारतात बेरोजगारांची संख्या १.८३ कोटी होती. सध्या देशाची ११ टक्के लोकसंख्या बेरोजगार आहे. आता भारत जगातील सर्वात जास्त बेरोजगारांचा देश बनला आहे. श्रमिक मंत्रालयाच्या सर्व्हेनूसार भारतात बेरोजरीने मागिल ५ वर्षात उच्चांक गाठला आहे. देशात बेरोजगारीची भयावह अवस्था असताना सुद्धा युवकांत बैचैनी दिसत नाही याचे कारण सोशल मीडिया आहे ज्याच्या साह्याने सरकारं,राजकिय पक्षांचे कार्यरत असलेले आयटी सेल यांच्यामार्फत यांना भूलथापा देवून त्यांचे लक्ष दूसरीकडे वळविले जात आहे. मोठया संख्येने युवकांना जाति-धर्माच्या नावावर असे भडकावले जात आहे की,त्यांचे लक्ष बेरोजगारीवर जाणार नाही.मात्र यामुळे बेरोजगारीची मूळ समस्या सुटते असे नाही.
अगोदर लोक आपल्या प्रश्नांवर आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर  उतरत असत मात्र आता ही पद्धत इतिहास जमा होत आहे आता विरोध प्रदर्शनाचे केंद्र सोशल मीडिया होत आहे. भारतात अत्यल्प दरात इंटरनेट डेटा उपलब्ध असल्याने अल्पवयीन मुलांच्याही हाती स्मार्टफोन असल्याने याचा सदुपयोग होण्याऐवजी दुरूपयोगच जास्त होत आहे. एका सर्वेनूसार ९२ टक्के गरीब किशोर वयीन मुले इंटरनेटचा वापर करित आहेत.तर चांगली आर्थिक स्थिती असलेल्या घरांमध्ये ६७ टक्के मुल इंटरनेटचा वापर करित आहेत. कित्येकवेळा अडिक्शनचा शिकार झालेल्या लोकांना हे ही कळत नाही की, ते वास्तविक जीवनापासून कधी दूर गेले आहेत.
जगात मादक पदार्थांचा व्यवसाय ज्या वेगाने फोफावत आहे त्यापेक्षाही अधिक वेगाने लोक सोशल मीडियाच्या जाळ्यात फसत चालले आहेत. युवकांबरोबरच लहान मुलही या डिजीटल व्यसनाचे शिकार होत आहेत. अमेरिकासहित कित्येक देशात या मानसिक आजारावर उपचार करण्यासाठी आता उपचार केंद्र सुरू झाले आहेत मात्र भारतासारख्या विकसनशिल देशात यावर आत्तापर्यंत गंभीरतेने विचार झालेला नाही. आता यावर उपाय शोधण्याची वेळ आली आहे अन्यथा युवक पिढी विकासाऐवजी विनाशाकडे वाटचाल करेल.
-सुरेश मंत्री.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा