मुख्य सामग्रीवर वगळा

महाराष्ट्र भूषण : अशोक सराफ


 ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे, तर गंभीर ते खलनायकापर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडवलं आणि रसिकांवर अधिराज्य गाजवलं आहे. त्यांच्या अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांना महाराष्ट्रभूषण देऊन राज्य सरकारने एका बहुरूपी कलाकाराचा सन्मान केला आहे. मराठी रसिकांची पोचपावती या निमित्ताने त्यांना मिळाली आहे.

अशोक सराफ यांचा जन्म ४ जून १९४७ रोजी झाला. गिरगावातील चिखलवाडीमध्ये अशोक सराफ यांचे बालपण गेले. अशोक सराफ यांचे शिक्षण मुंबईतील डी.जी.टी. विद्यालयात झाले. गोपीनाथ सावकार हे त्यांचे मामा होत. त्यांना आधीपासूनच अभिनेता व्हायचं होतं, पण त्यांनी नीट शिकावं आणि मग एखादी चांगली नोकरी करावी असं अशोक सराफ यांच्या वडिलांना वाटत होतं. त्यांनी वडिलांचा शब्द पाळत, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी सुरू केली. त्यासोबतच आपला अभिनयाचा छंद जोपासत ते नाटकांत काम करू लागले. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी शिरवाडकरांच्या ‘ययाती आणि देवयानी‘ या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारा व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवलं. काही संगीत नाटकांतूनदेखील त्यांनी भूमिका केल्या. लगीन घाई, सारखं छातीत दुखतंय, प्रेमा तुझा रंग कसा? मनोमिलन, झालं एकदाचं, व्हॅक्यूम क्लिनर, हमीदाबाईची कोठी, संगीत संशय कल्लोळ, हसतखेळत आदी नाटकातील त्यांच्या भूमिका अविस्मरणीय ठरल्या आहेत. 

                         अशोक सराफ यांनी १९६९ पासून चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी चित्रपटात काम करायला सुरुवात केल्यानंतरही काही वर्षं बँकेत काम केले. अशोक सराफ यांना खरी ओळख मराठी चित्रपटातून मिळाली. आयत्या घरात घरोबा, एक डाव भुताचा, वजीर, भस्म्या, खरा वारसदार, धुमधडाका, गंमतजंमत, अशी ही बनवाबनवी अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. हम पाच या मालिकेत त्यांनी साकारलेला आनंद माथुर तर आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. त्यांनी २५० हून अधिक मराठी चित्रपट केले, त्यापैकी १०० व्यावसायिक हिट ठरले. अशोक सराफ यांनी मराठीसोबतच ५० हिंदी आणि एका भोजपुरी चित्रपटात काम केले. विनोदी भूमिका साकारणं हा त्यांचा हातखंडाच. त्यामुळेच ते बहुतांश मालिका, चित्रपट आणि नाटकात विनोदी पात्र साकारताना दिसले. त्यांनी विनोदी सिनेमांमधून तुफान लोकप्रियता मिळवली.  त्यांचं काम पाहून त्यांना सिनेविश्वातील लोक 'अशोक सम्राट' म्हणू लागले. प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या या कलाकाराने मराठी चित्रपटसृष्टीसाठी मोलाचं योगदान दिलं आहे.

              आत्ताच नव्हे तर अगदी पूर्वीपासून कलाकारांनी चित्रपटांमध्ये एखादी नवी स्टाईल ट्राय केली की तो ट्रेंडच सेट होतो. कलाकारांच्या केसांपासून ते कपड्यांपर्यंत प्रत्येक गोष्टींकडे चाहते फॅशन म्हणून पाहात असतात आणि हेच ट्रेंड ते फॉलोसुद्धा करत असतात. अशोक सराफ यांच्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांच्या शर्टची वरची दोन बटने नेहमी उघडी असत. तुम्ही जर त्यांचे चाहते असाल तर एव्हाना ही गोष्ट तुमच्या नजरेतून चुकलेली नसेल. शर्टची दोन बटने उघडी असण्यामागचं कारण एकतर फॅशन हे आहेच पण त्याचं खरं कारण म्हणजे अशोक सराफ यांना शर्टची पूर्ण बटने लावल्याने अस्वस्थ वाटत असे. त्यांना यामध्ये गुदमरल्यासारखं व्हायचं. आणि शर्टची दोन बटने उघडी ठेवल्याने त्यांना फारच मोकळं आणि छान वाटायचं. अशात त्यांना अतिशय मोकळेपणाने कामही करता यायचं. आणि म्हणूनच मामा आपल्या शर्टची वरची दोन बटने नेहमी उघडी ठेवत. परंतु कालांतराने त्यांच्या चाहत्यांना ती फॅशन वाटू लागली आणि अशाप्रकारे त्यांनी हा नवा ट्रेंड सेट केला. 

अशोक सराफ यांना सिनेइंडस्ट्रीमधील लोक मामा या नावाने ओळखतात. मराठीत कलाकारांचा अजिबात तुटवडा नाही, पण आपल्या भाषेच्या सीमा ओलांडून एखादा नट देशव्यापी ओळखला जातोय किंवा त्यासाठी प्रयत्न करतोय असं दिसत नाही. एकाच वेळेला सिनेमा, रंगभूमी आणि टीव्ही ह्या तिन्ही माध्यमांवर हुकूमत गाजवणारे चतुरस्त्र कलाकार ह्या देशाने खूप कमी पाहिले, पण अशोक सर ह्या बाबतीत देखील अपवाद ठरले. विनोद हा नैसर्गिक असतो त्याला कुणाचा अपमान न करता सादर कसं करावं?  हे अशोक सराफ यांच्या अभिनयातून दिसून येतं. गोंधळात गोंधळ, राम राम गंगाराम, गोष्ट धमाल नाम्याची आणि सुना येती घरा या सिनेमातील भूमिकांसाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला आहे. तर पांडू हवालदार सिनेमातील भूमिकेसाठी त्यांना राज्य सरकारच्या पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे. तर मायका बिटुआ या सिनेमातील कामाबद्दल त्यांना भोजपुरी फिल्म पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्यातील सर्वौच्च नागरी सन्मान आहे. आरोग्यसेवा, उद्योग, कला, क्रीडा, पत्रकारिता, लोकप्रशासन, विज्ञान आणि समाजसेवा या क्षेत्रांत केलेल्या विशेष योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो. या क्षेत्रात महाराष्ट्राचे नाव देशात आणि जगभर नेणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यास सन १९९५ पासून सुरुवात झाली. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रुपये २५ लाख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. अशोक सराफ यांचे मनोरंजन क्षेत्रातील योगदान पाहता ते ख-या अर्थाने महाराष्ट्र भूषण आहेतच. मराठी सिनेसृष्टीला फुलविण्यात त्यांचाही मोठा वाटा आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. निश्चितच महाराष्ट्र सरकारने अत्यंत योग्य व्यक्तीला हा सन्मान दिला आहे.. 

-सुरेश मंत्री

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...