परिस्थिती खूप
बदलली आहे, तिची सर्व क्षेत्रातील भागिदारी वाढत
चालली आहे असे फक्त आपण वर्तमानपत्रात, टि.व्ही.चॅनलवर
आणि राजकीय नेत्यांच्या तोंडून ऐकतो. आपल्या क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या
तिचं उदाहरण देवून आपण तिच्यात झालेली प्रगती दर्शवितो. पण खर पाहिल तर काहीतरी
अदभूत करणारी ती प्रत्येक काळात राहिली आहे. सिता, द्रोपदी, रजिया
सुल्तान, राणी दुर्गावती, राणी
लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर पासून ते इंदिरा गांधी, सानिया मिर्झा पर्यंत. पण केवळ एवढ्यावरूनच तिच्या स्थितीत खूप बदल झालाय
हे खरे वाटत नाही. सामान्यातली ती आजही होती त्याच अवस्थेत आहे. ती सध्या काय करते ? तर चूल आणि मूल सांभाळते. एक चाकोरीबध्द जीवन जगते. ती घराण्याच्या
प्रतिष्ठेपायी नव-याचा अन्याय सहन करते, तिचा शारिरीक
छ्ळ केला जातो, ईच्छा नसतानाही तिचे तिच्या नव-याकडून
लैंगीक शोषण केले जाते. आजही तिला गर्भातच मारलं जात, आजही ती पुरुषप्रधान संस्कृतीच्या खाली दबली गेली आहे. आजही तिच्यावर
समाजकंटकांची वासनांध नजर पडते, ती अल्पवयीन असतानाही
तिच्यावर बलात्कार केला जातो. आजही ती सुरक्षीत नाही, स्वत:चे
संरक्षण करण्यात समर्थ नाही. आपण पुरुष मात्र तिची स्थिती बदलल्याच खोट चित्र उभा
करतोय.
प्राचिन काळापासून
भारतात पुरुषप्रधान संस्कृती आणि लैंगीक असमानता राहिली आहे. तिचे तिच्या कुटुंबाकडून
आणि समाजाकडून कित्येक वेळा दमन केले गेले, तिच्यावर अगणित अत्याचार केले गेले. तिच्यासाठी प्राचिन काळापासून चालत आलेले चूकीचे नियम
आणि पध्दतीला रुढी-परंपरेचे नाव दिले गेले. तिला आपल्या संस्कृतीने दुर्गा, आदिशक्ती, लक्ष्मी या नावाने पुजल खरं मात्र तिला
बंधनात जखडून ठेवल. प्राचिन भारतीय समाजात सतीची चाल, बाल विवाह, विधवांचे केशवपन, स्त्री-भ्रुण हत्या, हुंडा प्रथा, देवदासी प्रथा होत्या. सोबत तिचे लैंगिक शोषण करणे, कौटुंबीक हिंसाचार करणे सातत्याने चालायचे. मनुस्मृती सारख्या ग्रंथाने तर
जणू तिचा माणुस म्हणून जगण्याचा अधिकारच काढुन टाकला. पुरुष प्रधान संस्कृतीने
तिच्या सामाजिक आणि राजकीय अधिकारांवर म्हणजे कामाचे स्वातंत्र्य, शिक्षणाचा अधिकार यावर बंधने लादली. राजाराम मोहन रॉय यांच्या अथक
प्रयत्नांमुळे इंग्रजांना सतीची चाल बंद करावी लागली. ईश्वरचंद्र विद्यासागर, विनोबा भावे, स्वामी विवेकानंद, ज्योतीबा फुले यांनी तिच्या सक्षमीकरणासाठी आवाज उठवला, प्रसंगी तत्कालीन समाजासोबत कडवा संघर्ष केला.
विधवांचा पुर्नविवाह होत नसे, त्यांना हालाखीचे जीवन
जगावे लागे. ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रयत्नांमुळे विधवा पुर्नविवाह अधिनियम
१८५६ साली अस्तित्वात आला. दूसरीकडे शिक्षणापासून पूर्णत: वंचित असणारी ती
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रयत्नांमुळे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात
आली.
आजही तिची स्थिती
फारशी हव्या त्या प्रमाणात बदलेली नाही. तिची गर्भातच तपासणी करून ती जन्माला येण्याअगोदरच
हत्या केली जाते. हरियाणा सारख्या राज्यात मुलगी जन्माला येणे म्हणजे जणू पापच.
स्त्री-भृण हत्येमुळे समाजातील लिंग गुणोत्तरात मोठी तफावत निर्माण झाली. तिची
संख्या वाढावी म्हणून १९९४ ला लिंग परिक्षण प्रतिबंधक कायदा करण्यात आला. बीड
जिल्हयात काही वर्षांपूर्वी झालेल्या मोठया प्रमाणावरिल स्त्री-भृण हत्येमुळे
महाराष्ट्र बदनाम झाला. तेंव्हा कुठे शासन खडबडुन जागे झाले आणि या कायद्याची कडक
अंमलबजाणी झाली. अनेक डॉक्टरवर या कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. तरी आजही काही
महाभाग शेजारील राज्यात जावून लिंग परिक्षण करत आहेत. तिच्या अस्तित्वाची चाहुल लागताच गर्भातच तिची हत्या केली जात
आहे. काही समाजात तिची संख्या त्याच्यापेक्षा कितीतरी कमी झाली आहे. सामाजिक
असंतुलन निर्माण झाल्याने आज अशांना ती हवी आहे मात्र फक्त समाजाची गरज म्हणून.
बाकी तिचा सामाजिक दर्जा काही बदललेला नाही.
आजही ती सुरक्षित नाही. समाजकंटकांच्या वासनांध नजरा तिच्यावर
खिळतात. तिच्या अनेक मैत्रीणींवर बलात्कार झाले आहेत. वासनांध झालेले हे स्वत:ला
पुरुष म्हणवणारे षंढ आपल्या वासनेचे शमन करण्यासाठी ती अल्पवयीन असतानाही तिच्या
शरीराचे लचके तोडतात. महाराष्ट्राच्या बाबतीत म्हटलं तर स्त्री-अत्याचाराच्या
बाबतीत देशात तीसरा क्रमांक लागतो. २०१५ मध्ये एकूण ४,१४४
बलात्काराचे गुन्हे दाखल झाले. स्त्री अत्याचारात २१ टक्क्यांनी वाढ झाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यातील ब-याच प्रकरणातील आरोपी हे
पिडीतेच्या ओळखीचे होते. यातील अनेकांनी तिला लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक
शोषण केले होते. आजही आपण तिचे रक्षण करू शकत नाही, तिला इतर पुरुषांच्या
वासनांध नजरेपासून वाचवू शकत नाहीत. काही आगळीक झाली तर आपली बेअब्रू होईल म्हणून
तिचा आजही बालविवाह लावून जबाबदारी झटकली जाते. बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा
जिल्हा म्हणून ओळखला जातो. अनेक पालकांना वयात आलेल्या तिला आपल्या वृध्द
आई-वडिलांच्या देखरेखीखाली सोडून ऊसतोडीला जाता येत नाही म्हणून तिचा बालविवाह
लावून दिल्याची अनेक उदाहरणे मी माझ्या जिल्ह्यात बघितली आहेत. २००६ ला बालविवाह
प्रतिबंधक कायदा होवूनही आजही अनेक ठिकाणी बालविवाह होत आहेत. अकाळीच या कळ्या
खुरडल्या जात आहेत.
तिच्या लग्नासाठी
आजही हुंडा दयावा लागतो. हुंडा प्रतिबंधक कायदा, १९६१ करून्ही हुंडा पध्दत बंद
होण्याचे नाव घेत नाही. आजही तिला मुलापेक्षा दुय्यम स्थान दिले जाते. प्रत्येकाला
वंशाला दिवा म्हणून मुलगा हवाच. देशाच्या लोकसंख्येच्या ५० टक्के असणारी ती आजही
सक्षम नाही. तिला लहानपणापासून स्वंयपाक बनवणे गरजेचे आहे हे शिकवले जाते मात्र
तिला कमवणे गरजेचे आहे हे मात्र शिकवले जात नाही. तिला आपण आर्थिकदृष्टया सक्षम
होवू देत नाहीत. वाईट रुढी-परंपरा बंद करायला आपण तयार नाहीत. आपली मानसिकता तिच्या बाबतीत आजही फक्त उपभोगाची वस्तू अशीच
आहे. आपण आपली विचारधारा जर बदलली तरच देश बदलेल, तीही सक्षम होईल. आपण म्हणतो
ती सध्या काय करते ? ती गर्भात असतानाच तपसली
जाते. ती एखादीच अनेक यातनांतून जन्म घेते. ती हसते, बागडते
आईच्या कुशीत पण तिच हे हसणं-बागडनं आईच्या कुशीतच संपत. वयाबरोबर तिच्यावर बंधने
लादली जातात घराण्याच्या ईज्जतीच्या नावाखाली. ती गुलाम बनते पुरुष नावाच्या
प्राण्याची. मग तो तिचा बाप असो, तिचा भाऊ, प्रियकर किंवा नवरा असो. या सगळ्यांकडून आपल्या पुरुषी अहंकारापायी केवळ
तिचा वापर केला जातो. हल्ली ती फक्त गर्भातच नाही मारली जात तर रोज मारली जाते चूकीच्या
रुढी-परंपरेने. तिच्यावर फक्त बलात्कारच केला जात नाही तर याचा फायदा घेवून
राजकारणही केले जाते. काही राजकारणी तर यासाठी तिलाच जबाबदार धरुन आपली मुक्ताफळे
उधळत आहेत. सध्या ती फक्त भाषणाचा विषय झाली आहे. आज अनेक जण
विचारत आहेत खरच ती सध्या काय करते ? आजही ती हसते आहे, लढते आहे पुरूषप्रधान
संस्कृतीशी, विनाकारण होणा-या स्पर्शाशी, समाजकंटकांच्या वासनांध नजरेशी. ती आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून
जगते आहे. ती अंतराळ्वीर झाली आहे, ती राजकारणात आली आहे, ती खेळाडू बनून देशाचे नाव
उज्वल करित आहे. हेच पुरुषी षंढ
आपल्या घरातील तिच्यावर अनेक बंधने लादून कुणा दुस-याच्या घरातील तिच्या बद्दल
क्षणोक्षणी आजही विचारत राहतात की ती सध्या काय करते, खरंच ती सध्या काय करते....?

Excellent article
उत्तर द्याहटवा