आता परत अमेरिकेने आपले लक्ष चंद्राकडे केंद्रीत केले आहे.२०२३-२४ पर्यंत चंद्रावर मानवाला पाठवण्याच्या मिशनला घेवून अमेरिकेने कामाला वेग दिला आहे.अंतराळात आपल्या सर्वात जवळचा शेजारी असलेल्या चंद्राच्या बाबतीत प्राचिन काळापासून मानवात जिज्ञासा राहिली आहे.२० व्या शतकाच्या पूर्वाधापर्यंत तो केवळ दुर्बीणीद्वारे त्याचे चित्र घेवून आपली जिज्ञासा शांत करायचा.इ.स.१९५९ मध्ये प्रथमच रशियाचे (तत्कालिन सोव्हियत संघ) अंतराळ यान ‘लूना-१’चंद्राच्या जवळ पोहचण्यात यशस्वी झाले.यानंतर रशियाचेच ‘लूना-२’ यान चंद्रावर उतरण्यात यशस्वी झाले.सोव्हियत संघाने १९५९ ते १९६६ पर्यंत एकामागुन एक कित्येक मानवविरहित यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविले.
दुस-या महायुद्धानंतर अमेरिका आणि सोव्हियत संघादरम्यान शितयुद्ध शिगेला पोहचले होते त्यावेळी १२ एप्रिल १९६१ ला सोव्हियत संघाने युरी गागारिनला अंतराळात पाठवून अमेरिकेच्या पूढे बाजी मारली.साहजिकच यामुळे अमेरीकेच्या अहंकार आणि गौरवाला कुठे ना कुठेतरी ठेस पहुचली होती.अमेरीकेनेही यानंतर अंतराळाच्या क्षेत्रात आपली श्रेष्ठता सिद्ध करण्यासाठी आपला प्रचंड पैसा आणि वैज्ञानिक संसाधनं पणाला लावली.शेवटी नील आर्मस्ट्रांगने चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव म्हणून मान मिळवला.अमेरिकेच्या अपोलो मिशन अंतर्गत १२ लोकांनी चंद्रावर पाऊल ठेवण्याचा सन्मान मिळवला तर १० लोकांनी चंद्राला फेरी मारण्याचा.हे मिशन खूप खर्चिक असल्याने अपोलो-१७ नंतर थांबण्यात आले.तेंव्हापासून जवळपास पन्नास वर्षे अंतराळ कार्यक्रमांना मंजुरी देणा-यांनी चंद्राकडे दुर्लक्ष केले.मात्र आता ज्या प्रकारे चंद्रावर पहुचण्यासाठी जगातील विविध देशात स्पर्धा लागली आहे त्यावरून म्हणता येईल ‘चंद्र पुन्हा निघाला आहे.’
भारताच्या इस्त्रोला चंद्रयान-२ मध्ये अगदी शेवटच्या क्षणी अपयश मिळाल्यानंतर चंद्रयान-३ साठी अधिक जोमाने काम करण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे.चीन २०२४ पर्यंत आपले अंतराळ यात्री चंद्रावर उतरविण्याच्या कामाला लागला आहे.रशिया २०३० पर्यंत चंद्रावर उतरण्याच्या तयारीत आहे.एवढच नाही तर कित्येक खाजगी कंपन्या आपले उपकरण पहुचवण्यासाठी आणि प्रयोगांना गती देण्याच्या उद्देशाने नासाचे टेंडर मिळावे म्हणून प्रयत्न करत आहेत.याचे मुख्य कारण आहे चंद्राचे पृथ्वीच्या जवळ असणे.तिथपर्यंत पहुचण्यासाठी तीन लाख चौ-याऐंशी किलोमीटरचे अंतर केवळ तीन दिवसात पूर्ण करता येवू शकते.चंद्रावरून पृथ्वीवर रेडिओ संपर्क स्थापित करण्यासाठी केवळ एक ते दोन सेकंदचा वेळ लागतो.प्रश्न हा आहे की,मागिल ५० वर्षात कोणत्याही देशाने चंद्रावर उतरण्यासाठी कोणताही मोठा प्रयत्न केला नाही,मग अचानक असे काय झाले ज्यामुळे त्यांना पुन्हा तिथे जाण्याची गरज भासु लागली?
यासाठी वेगवेगळ्या देशांकडे आपापली कारणे आहेत.भारताच्या बाबतीत म्हटल तर चंद्रमोहिमेच्या स्वरूपात स्वत:ची तंत्रज्ञानातील उत्कृष्टता दाखवण्याची सुवर्णसंधी असेल.चीन तंत्रज्ञानाच्या स्तरावर स्वत:ला ताकतवर दाखवुन महाशक्ती बनण्याच्या दिशेने वाटचाल करू पाहत आहे.अमेरीकेसाठी चंद्रावर परत एकदा पोहचणे हा केवळ मंगळावर पोहचण्याचा पहिला टप्पा आहे.चंद्रावर उतरण्यासाठी सुरू असलेल्या स्पर्धेचे प्रमुख कारण आहे तिथे पाणी असण्याची शक्यता.अलीकडच्या काही संशोधनातुन चंद्रावरील ध्रुवीय प्रदेशात बर्फ असण्याची शंक्यता व्यक्त करण्यात आली आहे.हा बर्फ अंतराळ यात्रींसाठी पाण्याचा दुर्मिळ स्त्रोत तर असेलच सोबत सौर उर्जेच्या साहयाने पाण्याचे विघटन करून हायड्रोजन आणि ऑक्सीजन वेगळा करता येईल. ऑक्सीजनचा उपयोग श्वसनासाठी तर हायड्रोजनचा उपयोग अग्नीबाणाचे इंधन म्हणून करता येईल.चंद्रावर भविष्यात एक इंधन स्थानक उभारले जावू शकते जेणेकरून तिथे थांबून अंतराळ यानात इंधन भरून सौर मंडळातील दूरवरच्या यात्रा करण्यासाठी पूढे जाता येईल.
विविध देशांच्या सरकारांची नजर चंद्रावरिल सोने,चांदी,टाइटेनियम सारख्या खजिन्यावर आहे मात्र शास्त्रज्ञांची नजर तेथिल हेलियम-३ च्या साठयावर आहे. हेलियम-३ मुळे पृथ्वीवरिल उर्जेची गरज पुर्ण तर होईलच सोबत याच्या व्यापारातून अमाप संपत्ती सुद्धा मिळेल.भविष्यात अणूच्या केंद्रकिय विखंडनात एक स्वच्छ इंधन म्हणून याचा वापर करता येईल.हे स्पष्ट आहे की,या दशकात चंद्र मानवी गतीविधींचे केंद्र बनेल कारण तिथे उत्खननापासून मानवी वस्ती आणि हॉटेल बनवण्याच्या योजनांवर काम सुरू आहे.बघू या चंद्राबाबतीतच्या या स्पर्धेतून काय निष्पन्न होते,चंद्र आहेच साक्षीला.
-सुरेश मंत्री

Very nice information
उत्तर द्याहटवा