पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील जनतेला केलेल्या आव्हानानुसार देशातील जनतेने २२ मार्चला स्वयंफुर्तपणे कडकडीत जनता कर्फ्यू पाळला होता.याच दिवशी सायंकाळचे पाच वाजताच अगदी छोटया-छोटया वस्त्यांपासून मोठया शहरांपर्यंत देशात एक अद्भुत दृश्य पहायला मिळाले होते.संपूर्ण देश टाळया-थाळ्या आणि शंखांमधुन निघणा-या स्वरांनी निनादुन गेला होता.हे संगीत होत की,गोंगाट हे सांगण अवघड आहे मात्र यातुन देशाची अखंडता दिसुन आली.याच दिवसापासून देशात जागतीक महामारी कोविड-१९ विरूद्ध युद्ध छेडले गेले जे आजपर्यंतही सुरूच आहे.कोविड-१९ विरूद्धच्या या युद्धात पहिल्या पंक्तीत उभ्या असणा-या कोरोना वारियर्ससाठी हा शंखनाद त्या टिळया सारखा होता जो पत्नी,माता आणि बहिण युद्धावर जाणा-या वीर सैनिकाच्या मस्तकावर लावून निरोप देतात.फरक मात्र एवढा होता की,हे योद्धे केवळ शस्त्रहीन नव्हते तर कवचहीन सुद्धा होते.देशाला कोरोना विरूद्धच्या लढाईत जिंकुन दयायचच या आवेशात केवळ जनतेच्या प्रेरणेच पाठबळ घेवून हे खंदे सैनिक लढाईवर निघाले.
मात्र ही विडंबना आहे की,या टाळ्यांचा स्वर लुप्त झालाच नव्हता की आरोग्य कर्मचारी आणि पोलीस यांच्याबरोबर अरेरावी,मारहाण,दगडफेक आणि त्यांचा हात तोडण्याच्या बातम्या देशाच्या काना-कोप-यातुन येवू लागल्या.ते जिथे राहतात त्या घर मालकांनी,कॉलनीवाल्यांनी त्यांना बेघर करण्याची जणू मोहिम छेडली.ज्या कोणत्या योद्धयाने हे युद्ध लढण्यासाठी प्रशासनाला सुरक्षेसाठी पीपीई किटची मागणी केली त्याच्या विरूद्ध शिस्तभंगाच्या कारवाईचा बडगा उगारण्यात आला.वीरगती प्राप्त झालेल्या डॉक्टरला सन्मानजनक निरोपतर दुर,त्याचा अंत्यविधी सुद्धा करणे कठिण होवुन बसले.गोष्ट ईथच थांबत नाही तर या योद्धयांच्या मृत्यूवर शोक व्यक्त करून उर्वरित योद्धयांसाठी दर्जेदार पीपीई सुरक्षा कवच उपलब्ध करून देण्याऐवजी राजकिय पक्ष स्वत:च्या स्वार्थाच्या भाकरी भाजण्यात धन्यता मानत राहिले.
जेंव्हा पाणी डोक्यावरून जावु लागल तेंव्हा कुठे आक्रोशाचे तर कुठे हतबलतेचे स्वर निघु लागले.मग या योद्धयांच्या तथाकथित संघटनांनी विरोध करायच ठरविल.इंडियन मेडिकल असोसिएशनने २२ एप्रिलला वाईट अलर्ट प्रोटेस्ट तर २३ एप्रिलला काळा दिवस पाळण्याची घोषणा केली.वेळीच देशाचे गृहमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांनी कोरोना योद्धयांवर होणा-या हल्ल्यांच्या विरोधात आणि त्यांच्या संरक्षणासाठी ठोस पाऊले उचलण्याची घोषणा करून स्थिती हाताळली.या पेक्षाही हे सत्य भयावह आहे की,देशातील नागरिक एवढया लवकर २२ मार्चच्या संध्याकाळी कोरोना योद्धयांना केलेल्या आपल्या अभिवादनाला विसरले.या भ्रमित नागरिकांनी याचा विचार केला आहे का की,आपल्या दुर्व्यवहाराचा त्या सैनिकांच्या मानसिकतेवर काय परिणाम होईल जे आपल्याच आरोग्याच्या रक्षणासाठी दिवस-रात्र लढत आहेत.
देशातील जनतेच्या आरोग्याचे रक्षण करता-करता पोलीसच कोरोनाने बाधित होत आहेत.महराष्ट्रात आत्तापर्यंत ७८६ पोलीसांची कोरोना चाचणी पॉझीटिव्ह आली आहे.यामध्ये ७०९ अॅक्टीव्ह रूग्ण आहेत तर ७६ जण बरे झाले आहेत.राज्यात कोरोनामुळे ७ पोलीस कर्मचा-यांचा बळी गेला आहे.लॉकडाऊन दरम्यान राज्यात पोलीसांवर हल्ल्याच्या एकूण २०० घटना घडल्या आहेत.याप्रकरणी ७३२ आरोपींना अटक करण्यात आली आहे.महाराष्ट्र पोलीसांनी ही माहिती दिली आहे.देशातील कोरोना बाधितांची संख्या ६३,००० च्या जवळ गेली आहे.कोरोनाचा कहर काही थांबण्याचे नाव घेत नाहीय.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला जनता कर्फ्यूचे आव्हान करताना केलेल्या संबोधनात ही दिर्घ काळाची लढाई असल्याचे म्हटलेले आपल्याला आठवत असेल.ही लढाई लढत असताना लॉकडाऊन दिर्घकाळ ठेवता येणार नाही.तो टप्प्या-टप्प्याने उठवावा लागणार आहे.मात्र लॉकडाऊन नंतर सर्वकाही पूर्वी सारख सामान्य असेल असा विचार करण चूकीचे आहे.आपल्या दैनंदिन जीवनात खूप बदल करावे लागतील.शासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल.
देशात कोरोनामुळे स्थिती भयावह असताना आपल्यातील काही जणांकडून बेशिस्तीचे दर्शन होत आहे.लॉकडाऊनचे नियम तोडले जात आहेत.आपल्यासाठी अहोरात्र परीश्रम घेवून उपचार करणा-या आरोग्य कर्मचा-यांवर आणि शिस्तीचे पालन करून घेणा-या पोलीस कर्मचा-यांवर असेच हल्ले होणार असतील तर लॉकडाऊन उठवल्यानंतर आपण काय तारे तोडणार आहोत हे यातुन स्पष्ट दिसतच आहे.नियमांची पायमल्ली केल्यास देशात परत लॉकडाऊन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही.हे आपल्याच हाताने आपल्या पायावर धोंडा मारल्यासारखे असेल.त्यामुळे नियमांच काटेकोरपणेपणे पालन करा.आरोग्य कर्मचारी आणि पोलीसांचा सन्मान करा,त्यांना सहकार्य करा.आपली एकजुट आणि शिस्तबद्धताच आपल्याला कोरोनावर विजय मिळवून देईल.
-सुरेश मंत्री

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा