मुख्य सामग्रीवर वगळा

सुविचारांचा जागर करणारे आत्मचरित्र 'जागरण'


 लेखक, कविवर्य, वात्रटिकाकार श्री. भारत सातपुते यांचे 'जागरण' हे आत्मचरित्र वाचनात आले. पुस्तकाचे मुखपृष्ठ अत्यंत आकर्षक आणि बोलके आहे. आत्मचरित्राचा नायक म्हणजे स्वत: लेखक. त्याच्या जीवनातील बहुतांश काळ यात शब्दबद्ध केला जातो. कुठल्याही आत्मचरित्राची सुरूवात लेखकाच्या बालपणापासून होते. लेखकाचा अतीशय सामान्य कुटुंबात झालेला जन्म, हालाखीत गेलेले बालपण आणि शिक्षणासाठी केलेला संघर्ष पुस्तकाच्या पूर्वार्धात आहे. रस्त्यावर ओरडत चालले तर ‘‘ते खायला घे’’ म्हणून आईजवळ रडत बसायचे. आईकडे कुठले पैसे ? केसावर बंबई मिठाई मिळायची. आईने विंचरून न्हाणीच्या तुराटयांनी खचून ठेवलेले केस त्याला देऊन आमचे लाड पुरवायचे. दोन चार दिवसाला पुन्हा तो आला की पुन्हा आईजवळ हट्ट धरायचा, तवा आई चिडून म्हणायची, ‘‘आता कुठून घेऊ, मेले केसही जास्त गळत नाहीत ?’’ ‘कान तुटलेली काटवट अन एका बाजुला पळी व दुस-या बाजूला उलथने असलेले आई बरीच वर्ष जपू जपू वापरीत होती. सांडस नसल्याने पदराने धरून चुलीवरले भगुने उतरून घ्यायची. एकाच परातीत दोघे दोघे जेवायचे कारण घरात दोन दोनच जरमनच्या पराती, वाटया, तांबे असायचे. त्यातला मोठा तांब्या तर हागणदारीलाही वापरायचे. पुन्हा राखेने घासून खंगाळून तोच तांब्या पाणी प्यायला घ्यायचे’. अशा आणि ब-याच प्रसंगातून लेखकाच्या बालपणीची हालाकीची परिस्थिती सचित्र उभी करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. 

शिक्षक म्हणून सेवा काळात विविध परीक्षेत घेतलेली कॉपी विरोधी भूमिका, प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काम करताना विद्यार्थी हितासाठी घेतलेल्या कठोर भूमिका यातून निर्माण झालेले शञु व त्यामुळे आलेली अनेक संकटं यात चित्रीत करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार लेखकांनी उघडपणे मांडला आहे. ऊस तोड कामगारांसाठी शासनाने सुरू केलेल्या हंगामी वस्तीगृहाच्या चालकांनी राजकीय नेत्यांच्या आणि शिक्षण विभागातील भ्रष्ट अधिका-यांच्या पाठींब्यामुळे केलेली कोटयावधी रूपयांच्या शासकीय निधीची लुट आणि लेखकाने हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी केलेले प्रयत्न शिक्षण क्षेत्राचे वास्तव दाखवणारे आहेत. हल्ली पुरस्कार कसे मिळतात, याचे यथोचित वर्णन लेखकाने केले आहे. माध्यमिक शाळेचा प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काम करत असताना 'सुट्टी विना शाळा' हा आगळा वेगळा उपक्रम आणि यातच सहकारी शिक्षिकेने दाखल केलेला खोटा विनयभंगाचा गुन्हा यामुळे प्रशासनाने या उपक्रमाकडे केलेले दुर्लक्ष, सेवानिवृतीनंतर पेन्शन साठी केलेला संघर्ष अशा अनेक प्रसंगातून लेखकाचा एकूण जीवनसंघर्ष व शिक्षकी पेशाशी असणारी प्रामाणिकता लक्षात घेण्याजोगी आहे. 

आत्मचरित्र लिहिणे खूप कठिण असते. कुठल्याही आत्मचरित्रात लेखकाचे संपूर्ण जीवन कधीही येत नाही. शिवाय काही घटना-प्रसंगांचे विस्मरण झालेले असते. मात्र ज्या काही घटना आठवतात आणि महत्वाच्या वाटतात त्या अगदी बारीक सारीक तपशिलासह लेखकाने मांडल्या आहेत. आपल्या आयुष्याकडे तटस्थपणे पाहणे अवघड असते. ते ज्याला जमते तो आपल्या वर्तनाचा वस्तुनिष्ठ विचार करू शकतो. परखड आत्मपरीक्षण करू शकतो आणि प्रामाणिकपणे आपल्या आयुष्याचा पट वाचकांसमोर उभा करू शकतो. जागरण' या आत्मचरित्रा द्वारे गत जीवनाचा आलेख तटस्थपणे काढण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. तशी भारत सातपुते यांची आणि माझी फार ओळख नाही आणि प्रत्यक्ष कधी भेट ही नाही परंतु या आत्मचरित्र वाचनातून हा व्यक्ती आणि त्यांचे एकूण व्यक्तीतत्व कसे असेल याचे चित्रच माझ्यासमोर उभा टाकले. हे आत्मचरित्र लेखकाला वाचकांच्या नजरेत सामान्याकडून असामान्याकडे नेणारे आहे. आम्हा वाचकांना सुद्धा प्रेरणादायी आहे. 'जागरण' हे आत्मचरित्र सुविचारांचा जागर करणारे आहे. मी काही अभिजात लेखक, साहित्यिक किंवा समीक्षक नाही. माझ्या परीक्षणाची भाषा अलंकारिक, साहित्यिक चौकटीत कदाचित बसणार नाही. जवळपास ६० पुस्तके प्रकाशित असणाऱ्या श्री. भारत सातपुते यांच्या आत्मचरित्राचे परीक्षण करण्याइतका मी नक्कीच मोठा नाही. श्री. भारत सातपुते यांच्या 'जागरण' या आत्मचरित्रास माझ्या खूप-खूप शुभेच्छा !

 पुस्तक : जागरण

 लेखक : भारत सातपुते (८०८७६९५०००) 

 प्रकाशक : मांजरा प्रकाशन, लातुर

 पृष्ठे :३०२

 किंमत : ६०० रुपये

                                               पुस्तक परीक्षण

                                                 -  सुरेश मंत्री. 

                                                                  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...