मुख्य सामग्रीवर वगळा

मित्रांच्या गर्दीत हरवलेला मित्र


एकदा एका सहकाऱ्यासोबत सहज गप्पा रंगल्या होत्या. विषय होता – खरा मित्र कोण? मी त्याला विचारले, "तुझा सर्वात विश्वासू मित्र कोण आहे?" तो आत्मविश्वासाने म्हणाला, "अनेक आहेत." मी हसतच म्हणालो, "बरं, त्यापैकी चार जणांची नावे सांग." काही क्षणांत संपेल असे वाटणारे ते उत्तर बराच वेळ येईनाच. अखेर त्याने कसाबसा एकच मित्राचे नाव घेतले. तेही जणू संकोचाने. त्या क्षणी मला जाणवले—मित्रांची संख्या सांगणे सोपे असते; पण मनापासून ज्याच्यावर विश्वास ठेवता येतो, अशी व्यक्ती शोधणे मात्र फार कठीण असते. पुढे त्यानेच मला विचारले, "मग खरा मित्र कोण असतो?" मी शांतपणे उत्तर दिले, "संकटाच्या वेळी सर्वप्रथम ज्याची आठवण येते, तोच खरा मित्र." हे उत्तर ऐकून तो काही क्षण माझ्याकडे पाहत राहिला. कदाचित मी त्याच्या मनातीलच एखाद्या न बोललेल्या सत्याला शब्द दिले होते.
                           आज विज्ञानाने जग जवळ आणले आहे. एका क्लिकवर हजारो माणसे जोडली जातात; पण मनांमधील अंतर मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. मोबाईलच्या संपर्क यादीत शेकडो नावे आहेत, समाजमाध्यमांवर हजारो मित्र आहेत; पण मन मोकळे करावे, अश्रू पुसावे किंवा संकटात निःशब्दपणे खांद्यावर हात ठेवावा असा माणूस कितीजणांकडे आहे? कार्यालयांमध्ये रोज एकच दृश्य दिसते. लोक येतात, आपापले काम करतात आणि दिवस संपताच कोणाशीही संवाद न साधता निघून जातात. हसण्याचे आवाज कमी झाले आहेत, मनमोकळ्या गप्पा दुर्मीळ झाल्या आहेत आणि "कसा आहेस?" या प्रश्नामागील आत्मीयताही हरवत चालली आहे.
आजची सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे विश्वास हरवला आहे. ज्याला आपण मित्र म्हणतो, त्याच्याशीही मनातील सर्व गोष्टी बोलण्याचे धाडस होत नाही. मनात भीती असते—ही गोष्ट दुसऱ्यांपर्यंत पोहोचेल का? माझ्याच कमकुवतपणाचा गैरफायदा घेतला जाईल का? नात्यांमध्ये संशयाची सावली पडली की मैत्रीचे आकाशही काळवंडत. एका कवीने अत्यंत मार्मिक शब्दांत म्हटले आहे—

"हर तरफ, हर जगह बेशुमार आदमी, 

फिर भी तन्हाइयों का शिकार आदमी."
ही केवळ कविता नाही; ती आजच्या समाजाचे आरसे आहे. आपण स्वतःलाच विचारले पाहिजे—आपल्या मुलांना आपण नेमके काय शिकवत आहोत? स्पर्धा, तुलना, स्वार्थ आणि फायदा? की मैत्री, सहकार्य, त्याग आणि विश्वास? मित्रासोबत बाहेर जाऊन आला की आपण विचारतो, "पैसे कोणी दिले?" पण क्वचितच विचारतो, "आज मित्रासोबत वेळ छान गेला ना?" आपण त्याला खर्चापेक्षा हिशेब शिकवतो. मदतीपेक्षा व्यवहार शिकवतो. नकळत आपण मैत्रीतही नफा-तोट्याचे गणित आणतो.
खरी मैत्री व्यवहारावर नव्हे, तर विश्वासावर उभी असते. ती वेळ मागते, त्याग मागते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उपस्थिती मागते. मित्राला हे जाणवले पाहिजे की, "काहीही झाले तरी हा माणूस माझ्यासोबत उभा राहील. "खरा मित्र तो नसतो जो प्रत्येक गोष्टीत आपली स्तुती करतो. खरा मित्र तो असतो जो आपल्या चुकांवर स्पष्ट बोट ठेवतो, योग्य गोष्टीसाठी पाठ थोपटतो आणि चुकीच्या मार्गावर जात असताना निर्धाराने थांबवतो. कारण कौतुक करणारे अनेक भेटतात; पण सत्य सांगण्याचे धाडस करणारे फार थोडे असतात.
आज ईर्ष्येनेही मैत्री पोखरली आहे. मित्र पुढे गेला की आनंद होण्याऐवजी मनात तुलना सुरू होते. पण खरी मैत्री स्पर्धा शिकवत नाही; ती प्रेरणा देते. मित्राचे यश हे आपले अपयश नसते, तर आपल्यालाही पुढे जाण्याची प्रेरणा असते. माझा अनुभव सांगतो—मैत्री बोलण्यातून नव्हे, तर मदतीतून निर्माण होते. संकटात दिलेला हात, अडचणीत दिलेला आधार आणि निःस्वार्थी साथ—यातूनच विश्वास जन्माला येतो. विश्वासातून आत्मीयता आणि आत्मीयतेतून खरी मैत्री फुलते. जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर माणूस मागे वळून पाहतो, तेव्हा त्याला बँकेतील शिल्लक आठवत नाही; आठवतात ती संकटात सोबत उभी राहिलेली माणसे.
म्हणूनच जीवनात एक तरी असा मित्र कमवा, ज्याच्यासमोर मुखवटा घालावा लागणार नाही. ज्याच्यासमोर अश्रू लपवावे लागणार नाहीत. ज्याच्याशी मन मोकळे करताना शब्द मोजावे लागणार नाहीत. कारण— "हजार मित्र असण्यात मोठेपणा नाही; मोठेपणा त्यात आहे की, हजार जण तुमच्या विरोधात उभे असतानाही एक मित्र तुमच्या बाजूने ठामपणे उभा राहतो. "मैत्री ही नात्यांची संख्या नसते; ती विश्वासाची खोली असते.
-सुरेश मंत्री 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...