भारताची फुलराणी स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक जिंकून दिलं आहे. कांस्य पदकासाठी झालेल्या सामन्यात तिने चीनच्या खेळाडूचा फडशा पाडत कांस्यपदक पटकावले आणि भारताच्या बॅडमिंटन विश्वामध्ये इतिहास घडवला. बॅडमिंटनमध्ये दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी ती पहिली खेळाडू ठरली असून वैयक्तिक दोन पदके जिंकणारीही ती पहिलीच महिला खेळाडू ठरली आहे. यामुळे टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात आत्तापर्यंत एक रौप्य आणि एक कांस्य अशी दोन पदके जमा झाली आहेत.
शनिवारी पी.व्ही.सिंधू उपांत्य फेरीचा सामना जिंकू शकली नाही, यामुळे तिचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न भंगले होते. मात्र उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर कांस्यपदक जिंकण्याची तिला संधी होती. या संधीचं तिने सोनं केलं. कांस्य पदकासाठी झालेल्या सामन्यात तिने आक्रमक खेळ केला. ५२ मिनिटे चाललेल्या या सामन्यात सिंधूने चीनच्या बिंग जिआओला २-० असे नमवले. सिंधूने पहिला सेट २१-१३ तर दुसरा सेट २१-१५ असा जिंकला. या आधी उपांत्य फेरीत झालेल्या लढतीत सिंधूला पराभवाला सामोरे जावे लागले होते.
पी.व्ही.सिंधूच्या कामगिरीवर संपूर्ण देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. पण सिंधूच्या या यशामागे गेल्या अनेक वर्षांपासूनची खडतर मेहनत आहे. कुठलीही स्पर्धा ही सोपी नसते. अॉलिम्पिक मध्ये तर जगातील सर्वोत्तम खेळाडूंचा सहभाग असतो. या स्पर्धेतील यश-अपयशापेक्षा इथपर्यंत पोहचणे म्हणजे कोणत्याही खेळाडूला आकाश ठेंगणे होण्यासारखे आहे. या स्पर्धेत देशासाठी खेळण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. अनंत अडचणींचा सामना करित खेळाडू या स्पर्धेपर्यंत पोहचत असतात. आजवर सिंधूलाही अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागल आहे. तेंव्हा कुठे आज सिंधूने जागतिक बॅडमिंटनमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. पूर्सला वेंकट सिंधूचा जन्म ५ जुलै १९९५ ला हैद्राबादमध्ये एका तेलगु परिवारात झाला. पी.व्ही.रामण्णा आणि पी.विजया या राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटूंची सिंधू ही कन्या. रामण्णा यांना २००० मध्ये प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. १९८६ साली सेऊलमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक विजेत्या भारतीय संघाचा ते भाग होते. भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत सिंधूच्या आईनं तिच्या कारर्कीदीकडे लक्ष देण्यासाठी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली होती.
भारतासाठी सुवर्ण इतिहास रचणारी पी.व्ही.सिंधू जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे, बॅडमिंटनच्या तिच्या अप्रतिम क्रीडा प्रतिभाने तिने जगात भारताला वेगळी ओळख मिळवून दिली आहे. सिंधूच्या करिअरवर नजर टाकली असता असे लक्षात येते की, तिने बॅडमिंटनला खूप वेळ देवून त्यासाठी खूप संघर्ष केला आहे. नव्या तांत्रिक गोष्टींचा स्विकार करून तिन स्वत:ची एक वेगळी स्टाईल तयार केली. सिंधूचे आई-वडील व्यावसायिक व्हॉलीबॉल खेळाडू होते, परंतु सिंधूने २००१ च्या ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियन पुलेला गोपीचंद यांची छाप पडल्यानंतर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटु होण्याचा निर्धार केला. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी तिने हातात रॅकेट घेतले आणि या खेळाप्रती स्वत:ला झोकून दिलं. पी.व्ही.सिंधूने सर्वप्रथम महबूब अली यांच्या प्रशिक्षणाखाली या खेळाची मूलभूत माहिती समजून घेतली. सिकंदराबाद मधील भारतीय रेल्वे इंस्टीटयूट मधून प्रशिक्षण घेतले. त्यानंतर ती पुलेला गोपीचंद यांच्या बॅडमिंटन अकॅडमी मध्ये प्रशिक्षणासाठी सामील झाली. पाच फूट आणि अकरा इंच अशा उंचीचं वरदान लाभलेल्या सिंधूच्या खेळातील तंत्रकौशल्यावर गोपीचंद यांनी प्रचंड मेहनत घेतली.
२००९ साली सिंधूनं कोलंबोमध्ये ज्युनिअर बॅडमिंटन स्पर्धेत सहभाग घेतला होता. सिंधूची ही पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा ठरली होती. २०१२ साली लंडन ऑलिम्पिकची चॅम्पियन ली जुरेई हिचा पराभव करून तिन सर्वांच लक्ष वेधून घेतलं होतं. सप्टेंबर २०१२ साली वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी सिंधूचा जगातील टॉप २० महिला बॅडमिंटंनपटूंमध्ये समावेश झाला. २०१३ साली वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई करुन सिंधून या स्पर्धेत भारतासाठी पहिलं पदक जिंकल होत. त्यानंतर २०१५ हे साल वगळता तिनं प्रत्येक वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेत पदकाची कमाई केली आहे. सिंधूने २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले होते.
भारताला ऐतिहासिक विजय मिळवून देणाऱ्या सिंधूला अर्जुन पुरस्कार,राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आल आहे. यासोबत तिला भारत सरकारकडून पद्मश्री आणि पद्मविभूषण या सर्वोच्च नागरी पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं आहे. सिंधूच्या अगोदर कुस्तीपटू सुशील कुमारने ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकली आहेत. २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये ६६ किलो वजनी गटात फ्रीस्टाईलमध्ये सुशीलने कांस्यपदक जिंकले होते. तर २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये त्याने रौप्य पदक जिंकत इतिहास रचला होता. त्याची आता सिंधूने बरोबरी केली आहे. या विजयानंतर पी. व्ही. सिंधूवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तिचं अभिनंदन केलं आहे. देशासाठी परत एकदा अभिमानास्पद कामगिरी केल्याबद्दल पी.व्ही.सिंधूच अभिनंदन !
- सुरेश मंत्री

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा