चित्ता पृथ्वीतलावरचा अत्यंत वेगवान समजला जाणारा हा प्राणी आहे.शिकारीमागे तो ताशी १२० किलोमीटरच्या वेगाने धावतो. त्याचा वेग थक्क करणारा असाच आहे. जेव्हा तो शिकारीचा पाठलाग करतो तेव्हा त्याला कॅमे-यात टिपणं अवघड होवून बसतं. कारण त्याच्या शरीराच्या हलचाली अत्यंत वेगवान असतात. वन्यजीव अभ्यासकांच्या मते चित्यांसाठी गवताळ प्रदेश पोषक मानला जातो. चित्ता हा प्राणी सिंह, वाघ, बिबट्या या प्राण्यांप्रमाणेच फेलिडो अर्थात मार्जारकुळातील असल्याचं काही वन्यजीव अभ्यासकांच म्हणनं आहे. तर काही वन्यजीव अभ्यासकांना ते मान्य नाही. एकेकाळी चित्त्याचं वास्तव आफ्रिका आणि भारतीय उपखंडातील सपाट भुभागावर होतं. भारतात मुघलांच्या काळात देखील चित्ते मुबलक प्रमाणात होते. १६ व्या शतकात मुघल बादशाह जहांगीर यांच्या काळात जगात पहिल्यांदाच चित्ता पाळण्यात आला. आपल्या काळात एकूण १०,००० चित्ते होते आणि त्यापैकी १००० आपल्या दरबारात होते, अशी नोंद जहांगीर यांचे वडील अकबर यांनी केली आहे. तर मुघल सम्राट अकबरकडे ९,००० पेक्षा जास्त चित्ते होते. ऐतिहासिक नोंदीनुसार छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यातील महाराजा रामानुज प्रताप सिंहदेव यांनी ७३ वर्षापूर्वी १९४७ साली एका वयस्कर चित्त्याची शिकार केली होती. शिकार केल्यानंतर त्यांनी या शिकारीचे फोटो बॉम्बे नॅचरल हिस्ट्रीला पाठवले होते. महाराजा रामानुज प्रताप सिंहदेव यांचा चित्त्याच्या शिकारीसोबतचा हा फोटो शेवटचा फोटो समजला जातो. १९५२ नंतर भारतात एकही चित्ता सापडल्याची नोंद सापडत नाही. १९५२ साली भारताने चित्ता देशातून नामशेष झाल्याचे घोषित केले. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारतातून नामशेष होणारा हा एकमेव मोठा सस्तन प्राणी आहे. चित्त्यांच्या नामशेष होण्यामागे जंगलतोड हे कारण होते असे म्हटले होते. पण हे कारण १०० टक्के खरे आहे असे देखील नाही. यामागील इतर कारणे शोधण्याचा प्रयत्न केला तर दिसून येते की, स्वातंत्र्यपूर्व काळात मोठ्या प्रमाणावर होत असलेली शिकार हे मोठे कारण होते. पूर्वीच्या काळी शिकार हे शौर्याचं प्रतिक मानलं जातं होतं. उच्चभ्रू आणि राजघराण्यातील लोक खेळ-शिकारासाठी प्राण्याची शिकार करत असत आणि वाघांच्या तुलनेत चित्ता हे सोपे शिकार होते. त्यामुळं चित्त्यांची संख्या भारतात झपाट्याने कमी होत गेली. मात्र पुढे मोठ्या प्रमाणात शिकार केली गेल्याने ते नामशेष झाले. इराणमध्येही आता केवळ १२ चित्ते राहिले आहेत. आफ्रिकेत मात्र चित्त्यांचं आस्तित्व कायम असून सव्हानामध्ये चित्त्यांची संख्या मोठी आहे. जगभरातील जंगलांमध्ये देखील अवघे सात हजार चित्ते शिल्लक राहिले आहेत, त्यामुळे याला इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर या संस्थेच्या नामशेष होत चाललेल्या प्राण्यांच्या लाल यादीमध्ये टाकण्यात आले आहे. मात्र आता या चित्यांची भारतात पुन्हा एंट्री होणार आहे. जवळपास ७० वर्षांनंतर भारतातील जंगलात चित्ता परत येणार आहे. त्याची डौलदार चाल पुन्हा एकदा भारतीय वन्यप्रेमींना पाहायला मिळणार आहे. मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यान आफ्रिकी चित्त्यांच्या स्वागतासाठी तयार आहे. अंतरमहाद्विपीय स्थानांतरण योजनेअंतर्गत त्यांना भारतात आणले जाणार आहे. जर सर्व गोष्टी ठरल्याप्रमाणे झाल्या तर चित्ता येत्या १५ ऑगस्ट पर्यंत भारतात येण्याची शक्यता आहे.
'केंद्रीय
व्याघ्र संवर्धन प्राधिकरणा'ने (एनटीसीए) आफ्रिकन चित्त्यांचे भारतात पुनर्वसन
करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात परवानगीपर याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील
सुनावणीत न्यायालयाने 'एनटीसीए'ला भारतात चित्त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी परवानगी
दिली होती. भारतात चित्त्यांच्या
पुनर्वसनाकरिता योग्य जागेची निवड करण्यासाठी न्यायालयाने तीन सद्यसीय तज्ज्ञ
समितीची नियुक्ती केली होती. मध्य
प्रदेशातील 'कुनो पालपूर अभयारण्या'चे वातावरण आफ्रिका खंडातील चित्त्यांच्या
वास्तव्यास अनुकूल असल्याचा अहवाल २००९ च्या दरम्यान 'वाईल्ड लाइफ इन्स्टिटय़ूट ऑफ
इंडिया आणि 'वाईल्ड लाइफ ट्रस्ट ऑफ इंडिया' या संस्थांनी दिला होता. जयराम रमेश
यांच्याकडे २००९ साली 'केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालया'ची सूत्रे असताना 'वाईल्ड
लाइफ ट्रस्ट ऑफ इंडिया'चे अध्यक्ष एम. के. रणजितसिंह यांनी भारतात चित्त्यांचे
पुनर्वसन करण्याच्या योजनेचा प्रस्ताव ठेवला होता. केंद्रीय पातळीवर यासाठी अनुकूल
निर्णय झाला होता. सुमारे ३०० कोटी रुपयांची ही योजना होती. मध्य प्रदेश सरकारनेही
चित्त्यांच्या स्वागताची तयारी केली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने गिरच्या
सिंहांच्या मध्य प्रदेशातील स्थलांतराला अनुकूलता दर्शविताना चित्त्यांच्या
पुनर्वसन योजनेला स्पष्टपणे नकार दिला होता.
ज्या देशांमध्ये
चित्ते वास्तव्यास आहेत त्या देशांकडं भारताने चित्त्यांची मागणी केली होती. इराणमध्ये चित्ते असल्यामुळे त्यांच्याकडंही
मागणी करण्यात आली होती मात्र इराणने चित्ते देण्यास नकार दिला होता. इराणने नकार दिला असला तरी नामिबिया आणि
दक्षिण आफ्रिकेनं चित्ते देण्याची तयारी दर्शवली आहे. भारत सरकार यावर्षी ऑगस्टपर्यंत
नामिबिया देशातून आठ चित्ते मध्य प्रदेशातील कुनो-पालपूर राष्ट्रीय उद्यानात
आणण्याच्या तयारीत आहे. यानंतर
टप्प्याटप्प्याने ३० ते ४० चित्ते भारतात येतील. नामिबिया
आणि दक्षिण आफ्रिकेतून तज्ञांची टीम भारतात येऊन चित्त्यांची वाढ, त्यांचे पालनपोषण
अशा गोष्टींवर भारताला मार्गदर्शन करणार आहे. हे दोन्ही देश जगात सर्वात जास्त चित्त्यांची
संख्या असलेले देश समजले जातात. यात लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जगात असे पहिल्यांदा
होत आहे की, एका खंडातून
दुसऱ्या खंडात एका प्राण्याच्या प्रजातीचे विस्थापन केले जात आहे. पण त्यांच पुनर्वसन
योग्य पद्धतीने करण्याची आवश्यकता आहे. आफ्रिका आणि नामिबियातून
आणलेले चित्ते थेट जंगलात सोडण्यात आल्यास ते पुन्हा नामशेष होण्याची भिती वन्यजीव
अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. मात्र काहीही असले तरी
भारतात आता बिबट्यांना बघून चित्ता म्हणण्याचे दिवस संपतील असे म्हणण्यास वाव आहे.
चित्त्यांच्या येण्यामुळे भारताची पर्यावरणीय विविधता आणखी वाढणार आहे. देशातील जंगलांमध्ये असलेल्या अन्नसाखळीत
प्रमुख शिकारी म्हणून चित्ता त्याची भूमिका पार पाडेल अशा विश्वास मंत्रालयाने
व्यक्त केला आहे. ज्याप्रमाणे
देशात जागरूकतेने वाघांची संख्या वाढवली जात आहे. त्याचप्रमाणे देशातील संरक्षित जगलांमध्ये
चित्ते दिसू लागणार आहेत. भारतात चित्त्याची संख्या वाढावी यासाठी काही बाबींचा
विचार करण्याची आवश्यकता आहे. त्यामध्ये जैव प्रयोगशाळा उभारण्याची अत्य़ंत
आवश्यकता आहे. योग्य पद्धतीने चित्यांचं पुनर्वसन केल्यासं पुढच्या काही काळात
देशात त्यांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे. एखादा प्राणी परिसंस्थेत पुन्हा आणण्यासाठी किमान २० प्राण्यांची
गरज असते. चित्ता मार्जार कुटुंबातल्या इतर
कोणत्याही प्राण्यापेक्षा वेगाने धावू शकतो. पण अनेकदा त्यांना स्वतः केलेल्या
शिकारीचं संरक्षण करता येत नाही आणि कोणीतरी ती पळवून नेतं. अनेकदा त्यांची
पिल्लंही सिंहासारखे प्राणी घेऊन जातात. म्हणूनच
कुंपण असणाऱ्या संरक्षित जागेमध्ये चित्ते जास्त चांगले जगत असल्याचं तज्ज्ञ
सांगतात. कुंपण नसलेल्या जागांमधील चित्त्यांची
लोकसंख्या अधिवास नष्ट झाल्याने आणि चित्त्यांचीच इतर प्राण्यांनी शिकार केल्याने
कमी झाली. भारतातल्या अनेक जागा संरक्षित असल्या तरी त्यांना कुंपण नाही. त्यामुळे
माणूस - जंगली प्राणी संघर्ष होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर सरकारलाही गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. एखाद्या प्राण्याला अधिवासात पुन्हा
वसवण्यात कायमच काही धोके असतात. पण असं करता येणं दुर्मिळ नाही. १९८० च्या
दशकाच्या उत्तरार्धात मलावीमधून चित्ते नामशेष झाले होते. २०१७ मध्ये
मलावीमध्ये चार चित्ते पुन्हा वसवण्यात आले. आता इथल्या चित्त्यांची संख्या वाढून २४ झाली
आहे. जंगलामध्ये चित्त्यांचं पुरेशा
संख्येत प्रजोत्पादन करणं हे चित्ता पुन्हा आणण्यामागचं उद्दिष्टं असायला हवं.
नॅशनल पार्कमध्ये फक्त काही प्राणी आणून सोडणं पुरणार नाही. हा प्रकल्प फारसा
टिकणार नाही.
.jpg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा