काँग्रेससाठी ही सुखद गोष्ट आहे की,तिला गुजरात मध्ये हारता-हारता राज्यसभेची एक जागा मिळाली.खरं-तर ही जागा
काँग्रेसने अत्यंत तणावपूर्ण परिस्थितीत जिंकलेली असल्याने पक्षात उत्साह निर्माण
होणे स्वाभाविक आहे.मात्र हा उत्साह रसातळाला गेलेल्या काँग्रेसला वर उठण्यासाठीचा
मार्ग बनू शकेल का?मागील तीन वर्षात काँग्रेसची पंजाब वगळता
सर्व आघाडीवर पिछेहाट झाली आहे.येत्या काळात गुजरात आणि हिमाचल प्रदेश मधिल विधानसभा निवडणूका
होणार आहेत.या राज्यात काँगेसला यश मिळवता येईल का?काँगेसचा भावी चेहरा म्हणून ज्यांच्याकडे
पाहिल जात ते राहुल गांधी अध्यक्षपदाची धुरा स्विकारून काँग्रेससाठी अच्छे दिन
आणतील का?
काँग्रेसमध्ये स्वत:चा मतदार संघही
नसलेल्या मात्र नेहरू आणि गांधी परिवाराशी केवळ जवळीकता असलेल्या नेत्यांच्या
मर्जीनूसार काँग्रेसचे काम चालायचे.मोतीलाल व्होरा,अरूण सिंह,माखनलाल फोतेदार असे न जाणो
कितीतरी.काँग्रेस मध्ये स्वत:चे स्वतंत्र अस्तीत्व असणा-नेत्यांची आजही कमी आहे.गुजरात
मध्ये अहमद पटेल यांनी राज्यसभा निवडणूक जिंकल्यानंतर पक्षातीलच काही नेत्यांनी
त्यांच्यावर टिका केली होती.सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय समजले जाणारे अहमद पटेल
हे कांग्रेस मधिल स्वत:चे स्वतंत्र अस्तीत्व असणारे एकमात्र असे नेते आहेत.कोणताही
राजकिय वारसा नसलेल्या पटेलांनी गुजरातच्या राजकारणावर पकड ठेवली आहे.
१९६० पर्यंत भारतीय राजकारण फक्त एका
पक्ष प्रणालीवर आधारित होते.तो पक्ष काँग्रेस होता.आता फरक एवढाच आहे की
काँग्रेसची भूमिका भाजप बजावित आहे.अशात जर जनतेचा भाजप केंद्रीत राजकारणापासून
मोहभंग झाला तर याला दूसरा पर्याय जनतेसमोर असेल का?खरं तर देशात भाजपविरोधी पक्षांची काही कमतरता नाही मात्र एकटी काँग्रेस
सोडून ईतर राजकिय पक्षांचे राजकारण एक-दोन राज्यांपूरतेच मर्यादीत आहे.त्यांच्याकडे
कोणताही राजकिय दृष्टीकोनही नाही ज्याच्या आधारे ते भाजपासमोर कडवे आव्हान उभे
करतील.अशात जर काँग्रेस स्वत:ला एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून जनतेसमोर आपली
प्रतिमा ऊभा करत नाही तर हा भारतीय लोकशाहीसाठी वाईट संकेत मानला पाहिजे.
काँग्रेस संघटन सध्या संक्रमाणातून
जात आहे.मागील अनेक काळापासून प्रसार माध्यमे राहुल गांधी लवकरच काँग्रेस पक्षाची
कमान सांभाळतील असे सांगून सांगून थकले आहेत.सोनिया गांधी यांनी सक्रीय
राजकारणापासून दूर होण्याचे संकेत अनेक वेळा देवून सुद्धा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल
गांधी अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्यासाठी टाळाटाळ का करित आहेत याचे उत्तर तेच देवू
शकतात.याची कदाचित दोन कारणे असू शकतात.एक तर त्यांचा आपल्या क्षमतेवरच विश्वास
नसेल.दूसरे कारण म्हणजे कदाचित ते काँग्रेस आणि कांग्रेस बाहेरील काही नेत्यांच्या
सक्रीय राजकारणातून बाहेर पडण्याची वाट बघत आहेत.शरद पवार,लालू प्रसाद यादव,मुलायम
सिंह यादव,एम.करूणानिधी,विरभद्र सिंह,तरूण गोगाई,दिग्विजय सिंह,अमरिंदर
सिंह अशा सत्तरी पार केलेल्या आणि अनुभवी असलेल्या नेत्यांसोबत राजकिय संवाद साधने
अतीसुरक्षित वातावरणात वाढलेल्या ४७ वर्षिय राहुल गांधींच्या निश्चितच आवाक्यातली
बाब नाही.त्यांचे पिता राजीव गांधी यांनी सुद्धा त्यांच्यापेक्षाही कमी वयात
पंतप्रधान पदाची धुरा सांभाळली होती मात्र त्यांचे व्यक्तीमत्व हे खूप वेगळे होते.
राहुल गांधी यांच्याकडे
काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळण्याच्या बाबतीत अनिच्छेचे काही तीसरे कारणही असू शकते
मात्र निवडणूक आयोगाने पक्षाची अंतर्गत निवडणूक ३१ डिसेंबरच्या आत पार पाडण्यासाठी
सांगितले आहे.यामुळे राहुल गांधी यांना एक तर या तीन महिन्यात अध्यक्षपद
स्विकारावे लागेल अथवा राजकारणातून पिछेहाट होण्यासाठी तयार रहावे लागेल.२०१४ च्या
लोकसभा निवडणूकांपासून काँग्रेसची पिछेहाट सूरू आहे.लोकसभेत काँग्रेसला विरोधी
पक्ष म्हणून ही मान्यता मिळाली नाही.काँग्रेसला गेल्यातीन वर्षात चांगली बातमी
फक्त पंजाब मधून मिळाली आहे.बिहारमध्ये असलेली सत्ता नुकतीच काँग्रेसला गमवावी
लागली तर गोव्यात चांगला जनादेश मिळूनही काँग्रेस सत्तेत येवू शकली नाही.यापूढे
गुजरात आणि हिमाचल प्रदेश मधिल विधानसभा निवडणूका होणार आहेत.या दोन्ही राज्यात
काँग्रेसची अवस्था अगोदरच चांगली नाही.
काँग्रेसने गेल्या तीन वर्षात
एक गोष्ट चांगली केली ती म्हणजे जिथे-जिथे विधानसभा निवडणूका झाल्या तिथे-तिथे पक्षाकडून
संभ्रमात टाकणारी अवस्था ठेवली नाही.पंजाब मधिल निवडणूका अमरिंदर सिंहच्या,उत्तराखंडच्या निवडणूका हरीश रावतच्या तर
आसामच्या निवडणूका तरूण गोगाई यांच्या नेतृत्वाखाली लढण्यात आल्या.याचा वाईट
परिणाम एवढाच झाला की,काही जण पक्ष सोडून गेले.मात्र एक बाब
काँग्रेससाठी चांगली झाली म्हणजे दूधाचे दूध आणि पाण्याचे पाणी झाले.सगळ्यांना
घेवून चालणा-या काँग्रेसमध्ये शंकर सिंह वाघेला आणि हरिश रावत सारख्या दोन नावात
स्वार होवून चालणा-या काँग्रेसी नेत्यांची फौज खडी झाली होती.आता याचे प्रमाण कमी
होत चालले आहे.राहुल गांधी यांचा पक्षावरील प्रभाव सत्तेच्या राजकारणासाठी वाईट तर
वैचारिक लढाईसाठी चांगला आहे.
एक पक्ष सत्तेच्या बाबतीत
विचार केला तर १९६० च्या दशकापर्यंतची काँग्रेस आणि आत्ताची भाजपा यांच्यातील फरक
हा विचारधारेतील आहे.काँग्रेसची भूमीका सर्वसमावेशक तर आत्ताच्या भाजपाची भूमीका
समाजातील काही घटकांना कमी माननारी,त्यांच्या बद्दल सांशकता ठेवणारी आणि त्यांच्या विरोधात तणाव निर्माण
करणारी राहिली आहे.यामुळे लोकांचे लक्ष्य सरकारच्या गडबडींपासून हटत असते.मात्र
अशा परिस्थितीत आपल्या मोठया अपयशाला सांभाळणे सरकारला सोपे असणार नाही.अशात
विरोधी पक्षासाठी देशातील जनतेसमोर भाजपाला पर्याय म्हणून स्वत:ला उभा करण्याचे
आव्हान लोकसभा निवडणूकीच्या अगोदर येवू शकते.काँग्रेसला अशा शक्यतेचे नेतृत्व करून
जनतेसमोर भाजपाला पर्याय म्हणून जर उभा टाकायचे असेल तर त्याला लवकरात लवकर
युवकांना पक्षात संधी देवून समाजातून होणा-या स्वंयफूर्त विरोधाशी जवळीकता साधून सुसंवाद
साधला पाहिजे.काँग्रेसची ताकद त्याच्या संघटनापेक्षा त्याच्या विचारधारेत जास्त आहे.काँग्रेसचे
विचार जर परत लोकांना पटले तर बाजू पलटायला वेळ लागणार नाही.
-सुरेश मंत्री

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा