मुख्य सामग्रीवर वगळा

हजारो अनाथ लेकरांची आई हरपली


 नाथांची माय म्हणून ओळखल्या जाणा-या सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच नुकतच निधन झालं. सिंधुताईंच्या आयुष्याची कहाणी संघर्षमय असली, तरी प्रेरक आहे. कोवळ्या वयातील विवाह, त्यानंतर मुलांचा जन्म, मुलांना वाढवितानाच करावे लागणारे काबाडकष्ट, घरात आणि दारात होणारी उपेक्षा... पन्नास-साठच्या दशकात भारतातील बहुतेक महिलांची कहाणी अशीच असे. सिंधुताईंची कथा सुरुवातीला याहून वेगळी नाही. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर जेमतेम १५ महिन्यांचा कालावधी लोटला असेल, १४ नोव्हेंबर १९४८ ला आपला देश पंडित नेहरूंचा जन्मदिन “बालदिन” म्हणून साजरा करत होता आणि त्याच सुमारास वर्धा जिल्ह्यातील नवरगावी गुरे चारणाऱ्या अभिराम साठेंच्या घरात कन्या जन्माला आली. आयुष्य सुरु झालं खरं पण लाडकी लेक म्हणून नव्हे तर ‘नकोशी’ म्हणून. नाव ठेवलं गेलं ‘चिंधी’. हे बाळ घरात कधी कौतुकाचा विषय ठरलं नाही. मुलगी म्हणून कायम हेळसांड आणि दुर्लक्ष तिच्या वाट्याला आलं. ती त्यातही समाधानी होती, काही तक्रार म्हणून नव्हती आणि असती तरी कुणाकडे केली असती.

चाणाक्ष आणि तल्लख बुद्धीच्या चिंधीला शिक्षणाची भारी आवड ! वडिलांच्या प्रेमामुळे जेमतेम ४ थी पर्यंत तिला शिक्षण घेता आलं. गुरे चरायला गेल्यावर लहानशी चिंधी संधी साधत शाळेत जाऊन बसे. तिच्या वडीलांना तिला शिकविण्याची इच्छा होती, परंतु आईचा दुसवास आणि अवहेलना झेलत लहानशी चिंधी कुठपर्यंत मजल मारणार ? जेमतेम ११ वर्षांची असेल तेव्हा चक्क ३० वर्षाच्या श्रीहरी सपकाळ नावाच्या इसमाशी तिचा विवाह लावून देण्यात आला. त्यानंतर काही दिवसातच एकभूत आधार असलेलं वडिलांचं छत्र देखील काळाने हिरावून घेतलं. लहानपणीच लग्न झाल्यावर खेळण्या बागडण्याच्या वयात ती कोवळी पोर तीन लेकरांची आई झाली होती. गावातील इतर स्त्रियांप्रमाणेच चिंधीचं जगणं देखील शोषण आणि अपमानाने भरलेलं होतं पण तिच्यात एक वेगळेपण होतं, ते म्हणजे तिच्यातील आत्मविश्वास आणि चार चौघात आपलं म्हणणं ठामपणे मांडण्याची निर्भीडता तिच्यात ठासून भरलेली होती.

गावातील जनावरांचे शेण उचलण्याचा मोबदला मिळविण्याकरता ताईंनी पहिलं बंड पुकारलं. गावातल्या स्त्रियांना न्याय मिळवून दिला. ताईंचा विजय झाला पण गावातल्या जमीनदाराचा अहंकार दुखावला. झालेल्या अपमानाचा त्याला सूड घ्यायचा होता, त्यावेळी चिंधी नऊ महिन्यांची गर्भवती होती, सावकाराने तिच्या पोटातील मूल त्याचे असल्याचे सांगत तिच्या नवऱ्याचे कान भरले. नवऱ्याच्या मनात तिच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला आणि पूर्ण दिवस भरलेल्या ताईंना त्याने बेदम मारून घराबाहेर काढले. गुरांच्या लाथा बसून मरतील म्हणून तशा अर्धमेल्या अवस्थेत तिला गोठ्यात आणून टाकले. त्या अवस्थेत त्यांची कन्या जन्माला आली. नवऱ्याने हाकलल्यानंतर गावकऱ्यांनीही हाकलले. माराने अर्धमेल्या झालेल्या तिने त्या मुलीला नदीच्या थंड पाण्याने स्वच्छ केलं आणि तिला घेऊन आपल्या विधवा आईचं घर गाठलं. समाजाच्या धाकाने आईने चिंधीला घरातून बाहेर काढलं. निराधार झालेली चिंधी दहा दिवसांच्या चिमुकलीला घेऊन जीव देण्यासाठी निघाली, वाटेत तिला पाण्याकरता तळमळत असलेला भिकारी दिसला. त्याला चिंधीने पाणी पाजलं जवळचा भाकर तुकडा दिला. त्या भिकाऱ्याला थोडी तरतरी आली. या प्रसंगानं तीचं मन बदललं… हे दुसरं जीवन अनाथांना आश्रय देण्याकरता मिळालंय असं तिला वाटून गेलं. चिंधी करता हा पुनर्जन्म होता. तिच्याकरता आता चिंधीचे काही अस्तित्व उरले नव्हते. ती आता “सिंधू” झाली होती…अनाथांचे जीणे जगता-जगता सिंधुताई अनाथांची माय झाली, आपल्यासारख्या निराधार अनाथांना गोळा करत माईंनी भिक मागून त्यांची पोटं भरली. परभणी–नांदेड-मनमाड या रेल्वेस्थानकांवर माई दिवसभर भिक मागायच्या आणि रात्री झोपायला स्मशानात जायच्या. भीक मागताना त्या गायच्या

ये ऊन किती कडक तापते

बाई अंगाची फुटते लाही

दोन दिसाचा शिळा तुकडा वाढा

चालेल आम्हा वाढा. 

दार नका लावू

पुन्हा येणार नाही..

सिंधुताई सांगताना सांगतात कि ज्यावेळी त्यांना भिक मिळायची नाही त्यावेळी त्या स्मशानातील जळणाऱ्या चितेवर भाकरी भाजून खायच्या. अश्याप्रकारे स्मशानातील जळणाऱ्या चितेच्या उष्णतेत त्यांनी स्वतःच जीवन सावरलं. रात्री-अपरात्री देखील माई रेल्वे स्थानकांवर एकट्या जाऊन अनाथ मुलांना पदराखाली घेत मायेची सावली द्यायच्या. एक एक रस्त्यावरचं मुल ताई आपलसं करत गेल्या. हळूहळू लोक सिंधूताईंना “माई” म्हणून ओळखू लागले आणि स्वतःहून पुढे येऊन त्यांनी स्वीकारलेल्या अनाथ मुलांना दान देऊ लागले. त्यांनी अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली इतर मुलांची काळजी घेताना आपल्या मुलीमुळे दुजाभाव व्हायला नको म्हणून त्यांनी आपली मुलगी ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले. आज महाराष्ट्रात माईंचे चार अनाथ आश्रम आहेत. काही वर्षांपूर्वी माईंनी चिखलद-यात वसतीगृह सुरु केले. आज ब-याच मुली या ठिकाणी राहून शिक्षण घेत आहेत. जवळ-जवळ २००० पेक्षा जास्त मुलांच्या सिंधुताई आई झाल्या. सिंधुताई देवाकडे मागणं मागतांना म्हणत :

देवा आम्हाला हसायला शिकव

परंतु आम्ही कधी रडलो होतो.

याचा विसर पडू देऊ नकोस.”

सिंधुताईंसाठी समाजसेवा हा शब्द अपरिचित होता कारण त्या असे काही करत आहेत यावर त्यांचा विश्वास बसत नसे, समाजसेवा बोलून होत नाही असे त्यांचे मत होते. यासाठी काही विशेष प्रयत्न करण्याची गरज नाही, तुम्ही नकळत केलेली सेवा म्हणजे समाजसेवा. हे करत असताना आपण समाजसेवा करत असल्याची भावना मनात येऊ नये. मनात राहून समाजसेवा होत नाही. दोन वर्षांपूर्वी त्या अंबाजोगाईला आल्या असताना त्यांना प्रत्यक्ष ऐकण्याची संधी मला मिळाली होती. बोलत असताना त्या एकामागून एक इतकी वाक्ये उच्चारतं की ही बाई खरोखरच अन्नपूर्णा आहे की सरस्वती आहे, असे वाटे. मानवतेची केवळ भाषा न करता, ती कृतीतून साकारणाऱ्या सिंधुताई 'अनाथांच्या आई' होत्या. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करीत, आयुष्याला दोष न देता, त्यावर मात करीत सिंधुताईंनी उभे केलेले काम प्रशंसनीय आणि वंदनीय आहे. त्यांची कहाणी महाराष्ट्राला काही नवीन नाही. खुद्द त्यांच्या भाषणांतून, त्यांच्यावरील लेखनांतून आणि चित्रपटातून ते सर्वांसमोर गेले आहे. गेल्यावर्षीच त्यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हा पुरस्कार स्वीकारताना ''माझी प्रेरणा, माझी भूक ही पोटाची, भाकरीची. मी भाकरीला धन्यवाद देते कारण भाकरीच मिळत नव्हती. माझ्या लेकरांना भाकरी मिळावी म्हणून रानोरान फिरले. लोकांनी मला सहकार्य केलं. त्यावेळी देणाऱ्यांचे, त्या काळात ज्यांनी माझी झोळी भरली त्यांचे आणि मला जगण्याचं बळ दिलं त्या माझ्या लेकरांचा या पुरस्कारावर अधिकार आहे, उरलासुरला माझा,” अशीही भावना सिंधुताई सपकाळ यांनी व्यक्त केली होती. सिंधुताईंना त्यांच्या कार्यासाठी आत्तापर्यंत ७५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. पद्मश्री पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार, मूर्तीमंत आईसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार, आयटी प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा दत्तक माता पुरस्कार, शिवलीला महिला गौरव पुरस्कार, लोकसत्ताचा सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार, पुणे विद्यापीठाचा जीवन गौरव पुरस्कार हे त्यातले काही निवडक पुरस्कार आहेत. मला अनेक पुरस्कार मिळाले. पण ते पुरस्कार खाऊन पोट भरत नाही, म्हणून माई आजही लोकांसमोर पदर पसरत. चारपैकी एकाच अनाथाश्रमाला सरकारी अनुदान मिळतं. सात-आठशे मुलांच्या खर्चाची तजवीज करताना माईंची दमछाक होत असे. ‘गाना नही तो खाना नही, भाषण नही तो राशन नही’, असं म्हणत, आपल्या मुलांना दोन वेळ जेवायला मिळावं म्हणून त्या महाराष्ट्रभर हिंडत असत. माईंनी अनाथ मुलं वाढवली, त्यांच्या अनाथपणाची जाणीव न होऊ देता त्यांना वाढवलं, मोठं केलं, शिक्षण दिलं, जगण्याची प्रेरणा दिली. पण सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे माईंनी त्या मुलांना या समाजात मानाचं स्थान मिळवून दिलं. ‘निराश्रित’, ‘बेवारस’ असा शिक्का त्यांच्यावर बसू दिला नाही. या मुलांनाही त्याची जाण आहे. आपल्याला जे प्रेम मिळालं, तेच इतरांनाही मिळावं, म्हणून त्यांची धडपड सुरू असे. ‘देवा, आम्हांला हसायला शिकव. परंतु आम्ही कधी रडलो होतो, याचा विसर पडू देऊ नकोस’, हे माईंनी त्यांना शिकवलं आहे. ज्यांच्या नशिबी फक्त अवहेलना आली, जन्म घेतल्यानंतर त्यांच्या चिंधी या नावापासूनच ती सुरू झाली होती त्या पुढे जगासाठी जागृतीची पणती झाल्या. अनाथांची माय झाल्या. त्यामुळेच त्यांच्या जाण्याने आता कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

- सुरेश मंत्री. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...