पूर्वीच्या काळी दुधाचे उत्पादन अधिक होते. भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणी लाखो गायींची सेवा केली जात असे. गोपालन हा गावच्या परंपरेचा एक भाग होता. सणाला देशी तुपापासून विविध प्रकारचे पदार्थ बनवले जात. खूप दिवसांनी दोन माणसं भेटत असतील, तर घरात दूध, दही आहे की नाही, असा प्रश्न विचारला जाई. श्रद्धेनुसार ज्या घरात गाय पाळली जात नाही ते घर अपवित्र असते, असे मानले जाई. हळूहळू ही प्रथा संपुष्टात आली. आता डेअरी फार्म आणि परदेशी जातीच्या गायींच्या आधारे भरपूर दूध तयार केले जात आहे. देशातील दूध उत्पादनात अनेक चढ-उतार झाले आहेत. सद्यपरिस्थितीवर नजर टाकली तर १९७० च्या दशकात भारतात झालेल्या श्वेतक्रांतीचे यश आजही दिसून येते. श्वेतक्रांतीमुळे दूध उत्पादनाला पुन्हा एकदा चालना मिळत आहे. भारत दुध उत्पादनात प्रथम क्रमांकाचा देश झाला असला तरी निर्यातीत प्रथम क्रमांकावर येण्यासाठी खूप कष्ट करावे लागतील, कारण आपला देश त्यात खूप मागे आहे. जगात न्युझीलंड, अमेरिका व ऑस्ट्रेलिया हे तीन देश दूध स्वत: च्या देशातील जनतेला पुरवतातच पण आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे, ह्या नाजूक प्रकृतीच्या पेयाला जगभर निर्यातही करतात. पुढील काळात मोठ्या सहकारी दूध संस्थांनी आंतरराष्ट्रीय बाजारात उतरणे आवश्यक आहे. कारण आपल्या दुधाचा उत्पादन खर्च तुलनेने कमी आहे. त्यामुळे जगाच्या तुलनेत आपण ते किफायतशीर दरात विकू शकतो. तसेच बटर, खवा, चीज यांच्या विक्रीला चालना देऊ शकतो. यासाठी नेस्लेसारख्या कंपनीप्रमाणे दूध संस्थांनी प्रचंड मोठे प्लँट उभे केले तर जगाच्या बाजारपेठेत आपले डेअरी प्रॉडक्ट्स सहजगत्या विकता येतील. त्यातून रोजगारही वाढेल.
डेअरी अॅनालॉग्स, वनस्पती-आधारित उत्पादने आणि भेसळ करणारे हे डेअरी उद्योगासाठी एक मोठे आव्हान आणि धोके आहेत. त्याचबरोबर हिरवा चारा संसाधनांचा अभाव आणि जनावरांच्या रोगांवर कुचकामी नियंत्रण याकडे आज लक्ष देण्याची गरज आहे. आजही पशुधनाची काळजी घेण्यासाठी देशात पुरेशा प्रमाणात पशुवैद्यकच उपलब्ध नाहीत. देशात सध्या ५९ हजार नोंदणीकृत पशुवैद्यक असून या क्षेत्राची व्याप्ती लक्षात घेता देशात १ लाख २५ हजार पशुवैद्यकांची गरज आहे. देशात देशी जातींसाठी क्षेत्राभिमुख संवर्धन धोरणाचा अभाव आहे आणि अधिक दुधाच्या पार्श्वभूमीवर देशी जाती वाचवणे हे सरकारसमोर मोठे आव्हान असेल. दुध व्यवसाय आणि उत्पादनाशी निगडित शेतकऱ्यांना नवीन तांत्रिक कौशल्ये आणि दर्जेदार बाजार व्यवस्था उपलब्ध करून देण्यावरही सरकारने भर देण्याची गरज आहे, जेणेकरून लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊन अधिकाधिक लोक एकमेकांकडे बघून या क्षेत्रात जोडले जावेत याचा फायदा होईल. जगाला रोज ९५१.२३ दशलक्ष टन दुधाची गरज असताना जगभर उष्णता वाढत असल्याने सध्या केवळ ८६४.८६ दशलक्ष टन दूध उपलब्ध होत आहे. ही परिस्थिती भारताचीच नसून विकसित देशातही दुधाची टंचाई भासत आहे. डेअरी उद्योगाने देशात ८ कोटी लोकांना रोजगार मिळवून दिला आहे, पण वातावरणातील बदलांमुळे दरवर्षी दुधाचे उत्पादन तीन दशलक्ष टनाने कमी होईल असा अंदाज आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांना ते महागड्या दराने विकत घ्यावे लागेल. यामुळे या विषयावर गंभीरपणे चर्चा होणे आवश्यक आहे. हवामानातील उष्णतेमुळे पशुपालनावर व त्यांच्या खाद्यावर परिणाम होत असून त्यावर उपाय करता येतील, पण गरम वातावरणात दूध लवकर खराब होते आणि त्यामुळे त्याचा उत्पादनावरही परिणाम होत आहे. दूध उत्पादनात भारत अग्रेसर असल्याने यापुढे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठीच्या उपाययोजनांत भारताला योगदान द्यावे लागेल. त्यासाठी संशोधकांची फौज कामाला लावावी लागेल. कोट्यवधी शेतक-यांची उपजीविका दुधावर अवलंबून असताना भारत वर्षाला ८.५ लाख कोटी रुपयांचे दूध उत्पादन करतो. पण याकडे बड्या अर्थतज्ज्ञांसह देशातील अनेक लोकांचे दुर्लक्ष होत आहे. खेड्यांमधील विकेंद्रीत अर्थव्यवस्था याचे उदाहरण आहे. गहू आणि तांदळामधून होणारी उलाढाल देखील दुधाच्या उत्पादनइतकी नाही. हा व्यवसाय गरीब देशांसाठी उद्योगाचे एक आदर्श उदाहरण ठरू शकेल.
-सुरेश मंत्री
.jpeg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा