या उपग्रहाच्या निर्मितीबाबत आणि संशोधनाबाबत भारत आणि अमेरिका दरम्यान २०१४ मध्ये करार करण्यात आला होता. या उपग्रहाचे वजन हे सुमारे २७०० किलो एवढे असून पृथ्वीपासून सुमारे ७४७ किलोमीटर अंतरावर प्रक्षेपित केला जाणार आहे. विशिष्ट उंची आणि शक्तीशाली रडार यामुळे अवघ्या १२ दिवसांत दिवसांत अत्यंत सुस्पष्ट छायाचित्रांसह संपूर्ण पृथ्वीचा नकाशा-जमिनीची मोजदाद करणे या उपग्रहामुळे शक्य होणार आहे. या उपग्रहाचा कार्यकाल हा ३ वर्षे निश्चित करण्यात आला आहे. हा उपग्रह लॉन्च झाल्यानंतर, ज्वालामुखी, भूकंप, ग्लेशियर्स वितळणे, वादळ, जंगलातील आग, समुद्र पातळी किंवा त्याहून अधिक घट, मान्सून म्हणजे आपण ज्या प्रकारच्या आपत्तींची कल्पना करू शकतो, त्या सर्वांची माहिती देईल. निसार' उपग्रह प्रगत रडार इमेजिंगचा वापर करून जमीन आणि बर्फाच्या उंचवट्यांचे पाच ते १० मीटर पृथक्करण करून महिन्यातून चार ते सहा वेळा पाहणी करेल. पृथ्वीवरील सर्वाधिक गुंतागुंतीच्या काही नैसर्गिक प्रक्रियांचे निरीक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या मोजमापासाठी या उपग्रहाची रचना केली आहे. यामध्ये परिसंस्थांना होणारे त्रास, हिमनग कोसळणे आणि भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी आणि भूस्खलन यांसारख्या नैसर्गिक धोक्यांचा अभ्यास होणार आहे. 'निसार'कडून सर्व माहिती निरीक्षणानंतर एक किंवा दोन दिवसांनी उपलब्ध होईल, तसेच नैसर्गिक आपत्तींसारख्या आपत्कालीन परिस्थितीत तो काही तासांतच उपलब्ध होईल.
भूपृष्ठाचा काही भाग जेव्हा काही कारणांमुळे भंग पावतो किंवा कोसळतो, तेव्हा जे छिद्र तयार होते, त्याला विलयछिद्र किंवा भूछिद्र म्हणतात. भूछिद्रे तयार होण्याची बरीच कारणे आहेत. अनेक वेगवेगळ्या संभाव्य यंत्रणांमुळे भूपृष्ठावरील गुहांमध्ये पृष्ठभाग कोसळू शकतो. गुहा लहान किंवा खूप मोठ्या असू शकतात आणि पृष्ठभागाच्या खाली उथळ किंवा खोल असू शकतात. कोसळणे ही प्रक्रिया अचानक, म्हणजे काही सेकंदामध्ये घडू शकते, तर काहींना अनेक दशके लागू शकतात. सध्या आपल्याकडे 'कडे' कोसळणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. जमीन संकुचित होण्याच्या काही दिवस आधी हालचाली सुरू झालेल्या असतात, ज्या आपल्याला 'निसार' इमेजिंगमुळे बरेच दिवस आधी समजण्यास मदत होईल आणि कदाचित मोठी आपत्ती टाळता येईल. बऱ्याच परिसंस्था वणवे आणि आगींमध्ये बेचिराख होतात. वणवे किंवा आगीच्या धोक्याचे वर्गीकरण करणे, शोधणे, होरपळलेले क्षेत्र ओळखणे आणि आगीची तीव्रता मोजणे, हे आगीचे परिणाम कमी करण्यासाठी महत्त्वाचे आहे. हे कार्य 'निसार' करणार आहे. दरवर्षी, तेल आणि रासायनिक गळतीमुळे शेकडो लोकांना आणि पर्यावरणाला हानी पोहोचत असते. महासागर आणि खाडीच्या विस्तीर्ण मोकळ्या पाण्यात सांडलेले तेल जलद ओळखणे हे नुकसान कमी करण्यासाठी महत्त्वाचे आहे आणि 'निसार' यासाठी आवश्यक माहिती देऊ शकते. 'निसार' भविष्यात भूजल वाचविण्यासाठी आणि इतर अनेक आपत्तींपासून आपल्याला वाचवण्यात यशस्वी होईल. यासह, हे वेळोवेळी अवकाशात जमा होणारा कचरा आणि अंतराळातून पृथ्वीवर येणा-या धोक्यांविषयी देखील माहिती देईल. इस्रो व नासा यांचा निसार हा उपग्रह पृथ्वीच्या अभ्यासासाठी पाठवला जाणारा पहिला उपग्रह नाही. पृथ्वीचा अभ्यास करणारे किमान १३० उपग्रह सध्या अवकाशात फिरत असून ते पृथ्वीचा अभ्यास करीत आहेत. फक्त या संशोधनात कुठलाच समन्वय नाही त्यामुळे एवढे उपग्रह सोडूनही ठोस काही हाती आलेले नाही. ख-या अर्थाने, जगातील सर्वात जुन्या आणि सर्वात मोठी लोकशाही असलेले हे दोन देश यानिमित्ताने एकत्र येऊन काम करत आहेत. भारत आणि अमेरिकेच्या मैत्रीचं हे आणखी एक उदाहरण आहे.
-सुरेश मंत्री
.jpeg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा