मुख्य सामग्रीवर वगळा

आषाढी वारीला मिळणार जागतिक वारसा

लवकरच पंढरपूर वारीचा जागतिक वारसा यादीत समावेश होऊ शकतो. यासाठी केंद्र सरकार युनेस्कोला येत्या दोन ते तीन महिन्यांत प्रस्ताव सादर करेल. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत, इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राचा वतीने हा प्रस्ताव सादर केला जाईल. वारीचे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या माध्यमातून अध्ययनपर चित्रीकरण पूर्ण केले आहे. वारीशी संबंधित सर्व साहित्यही संकलित करण्यात येत असून येत्या दोन-तीन महिन्यांत पंढरपूर वारीला जागतिक वारसा दर्जा मिळावा यासाठी युनेस्कोकडे पाठवला जाईल. अशा स्थितीत पंढरपूरच्या वारीला जागतिक वारशाचा दर्जा मिळाल्यास विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बाब ठरणार आहे.

पंढरीच्या वारीची परंपरा बरीच जुनी आहे. साधारण तेराव्या शतकात वारीचा उल्लेख आढळतो. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती. त्यांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेख आढळतो. संत तुकाराम यांची संत ज्ञानेश्वरांवर श्रद्धा होती. दर वद्य एकादशीला संत तुकाराम महाराज आळंदी येथे जाऊन माऊलींच्या समाधी समोर कीर्तन करीत असत. आजही वद्य एकादशीला कीर्तनाचा मान हा देहूकरांचा असतो. एवढेच नाही तर ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे गाभारा मंदिर हे संत तुकाराम महारांजांनी उभारले होते. त्यामुळे तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण महाराज हे सप्तमीला वडिलांच्या पादुका घेऊन आळंदीला जायचे आणि अष्टमीला माऊलींच्या पादुका देखील त्याच पालखीत ठेऊन पंढरपूरकडे मार्गस्थ व्हायचे. तुकाराम महाराजांपर्यंत वारीचे स्वरूप पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्या, असेच राहिले. पालखीची परंपरा जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचे तृतीय चिरंजीव नारायण महाराज यांनी १६८५ मध्ये सुरु केली. तेंव्हापासून या पालखी सोहळ्याची परंपरा सुरु झाली. जवळपास गेली दिडशे वर्षे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांचा पालखी सोहळा देहू आणि आळंदीमधून पंढरपूरकडे मार्गस्थ होत असतो. सुरुवातील या पालखी सोहळ्यामध्ये लाकडांच्या पादुका होत्या. तसेच यात ज्ञानोबा-तुकाराम म्हणायची सुरुवात देखील नारायण महाराजांनीच केली. एखाद्याला वाटेल, काय हा उद्दामपणा? पंढरीला जाताना पंढरीनाथाऐवजी ‘ज्ञानोबा तुकाराम’ चा जयघोष? त्यांना काय ठाऊक, की एखाद्या आईकडे जर काही काम असेल तर तिची स्तुती न करता तिच्या मुलाची करावी, म्हणजे काम नक्की होते. हेच तर महाराष्ट्रातील चाणाक्ष वारकऱ्यांनी अचूक हेरले, म्हणून तर पांडुरंगाच्या दोन अतिलाडक्या लेकरांच्या नावाने साद घालीत ते पंढरी दुमदुमून सोडतात. जगात असे कोणतेही क्षेत्र नसेल, की जेथे भगवंतापेक्षा त्याच्या भक्तांचाच जयजयकार होतो. नारायण महाराजांनी जेव्हा ही परंपरा सुरु केली तेव्हा त्यांच्यासोबत बाराशे वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी झाल्याच्या नोंदी आजही सापडतात. म्हणून आजही संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा हा सप्तमीला पंढरपूरकडे मार्गस्थ होतो. तर संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा हा अष्टमीला पंढपूरकडे मार्गस्थ होतो. त्या काळात एखाद्याला पालखीपदस्थ करणे, हा सर्वांत मोठा सन्मान होता. तो या संतश्रेष्ठांना दिला गेलाच; परंतु आता आपण ज्ञानोबा-तुकोबांच्या समवेत वारी करीत आहोत, असे प्रोत्साहक वातावरणही निर्माण झाले आहे. 

वारीमध्ये समावेश होणा-या पालख्या म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली-आळंदी, संत निवृत्तिनाथ - त्र्यंबकेश्वर, संत सोपानदेव-सासवड, संत मुक्ताबाई - एदलाबाद (मुक्ताईनगर), संत विसोबा खेचर-औंढा नागनाथ, संत गोरा कुंभार-तेर, संत चांगदेव- पुणतांबे, संत भानुदास आणि एकनाथ-पैठण, संत तुकाराम महाराज- देहू , जगन्मित्र नागा - परळी वैजनाथ, राघव चैतन्य - आळंद गुजौरीज, केशव चैतन्य - ओतूर, बोधलेबुवा - धामगाव, मुकुंदराज - आंबेजोगाई, जोगा परमानंद - बार्शी, कान्होराज महाराज - केंदूर, संताजी जगनाडे - सुंदुंबरे या पालख्यांचा प्रामुख्याने समावेश असतो. या सर्व पालख्या वाखरीजवळ एकत्रित येतात. विठुरायाच्या नामाचा भक्तिमय जागर होत अवघे आसमंत दुमदुमून जाते. वारीच्या वाटेवर कीर्तने होतात. जागरात रात्रभर अभंगांचे गायन होते. कोणी केव्हा काय करायचे, याचे वेळापत्रक ठरलेले असते. वाद, संघर्ष उद्भवलाच, तर त्याची सोडवणूक कशी करायची, याची यंत्रणाही कार्यरत असते; पण असे प्रसंग क्वचित येतात. वारीत स्त्री-पुरुषांचे पारंपरिक खेळ सुरू असतात. उच्च-नीच, लहान-मोठा, स्त्री-पुरुष अशा भेदाभेदांचे विसर्जन येथे पाहायला मिळते. लौकिक आणि अलौकिक यांची एवढी घट्ट वीण अन्यत्र क्वचितच पाहायला मिळेल. ना आमंत्रण, ना गाड्या घोडे ना बाकी काही, तरीही आषाढी सोहळ्यासाठी  वैष्णवांचा मेळा अनेक मैल पायी प्रवास करत विठुरायाच्या पंढरीत पोहचतो. गेली अनेक वर्ष ही वारीच्या परंपरेचा महाराष्ट्र साक्ष देत आहे. कोणतीही अपेक्षा न ठेवता, फक्त त्याच्या कळसाचे दर्शन घेण्यासाठी श्रीहरीच्या गजरात विठुरायाची पंढरी गजबजून जाते. 

वारी हे महाराष्ट्राला जोडणारे व्यापक 'नेटवर्क' आहे, असे म्हटल्यास आश्चर्य वाटायचे कारण नाही. वारीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, तिची सामूहिकता. ती समूहाने करायची गोष्ट आहे. ती काही तरी प्राप्त होण्यासाठी वैयक्तिक पातळीवर करण्यात येणारी साधना नाही. महाराष्ट्रात असे एखादे गाव क्वचितच असेल, की जेथून एकही व्यक्ती वारीला येत नाही. या माध्यमातून महाराष्ट्राची प्रमाण मराठी घडत गेली. सामाजिक ऐक्य आपोआपच सिद्ध झाले. वारकरी पंढरीला 'दिंडी' नावाच्या समूहात गात, नाचत, बागडत, खेळत जातात. दररोज पंचवीस ते तीस किलोमीटरचा प्रवास करत या दिंड्या आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपुरात पोहचतात. आपल्या प्रापंचिक सुख-दु:खांची ओझी उतरवून, विठ्ठलाकडून प्रेम नावाची ऊर्जा घेऊन आपापल्या स्थळी परत जातात. आता या पंरपरेची जागतिक नोंद देखील घेतली जाणार आहे. वारीची ही परंपरा शेकडो वर्षे अखंडपणे चालवत आलेल्या वारकरी संप्रदायांच्या अनेक पिढ्यांसाठी हा मोठा सन्मान ठरणार आहे. 

-सुरेश मंत्री.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...