मुख्य सामग्रीवर वगळा

मीराबाई चानूची चमकदार कामगिरी

भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने वेटलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला. मीराबाईने ४९ किलो गटात २०० किलो वजन उचलून रौप्य पदक जिंकले आहे. कोलंबियातील बोगोटा येथे बुधवारी ही स्पर्धा पार पडली. विशेष म्हणजे तिची प्रतिस्पर्धी खेळाडू झिहुई ही ४९ किलो वजनी गटातील ऑलिम्पिक चॅम्पियन आहे. तिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ४९ किलो गटात सुवर्णपदक जिंकले होते. मीराबाईने या स्पर्धेत झिहूईचा पराभव केला आणि रौप्य पदक पटकावले. झिहुईला कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे, मीराबाई चानूला या वर्षी सप्टेंबरमध्ये ट्रेनिंदरम्यान दुखापत झाली होती. ती मनगटाच्या दुखापतीशी झुंज देत आहे. तिने क्लीन अँड जर्कमध्ये ११३ किलो वजन उचलले. मात्र, स्नॅच प्रकारात वजन उचलत असताना तिचा तोल गेला पण अशा परिस्थितीतही तिने स्वत:चा शानदार बचाव केला. मीराबाईने स्नॅचमध्ये ८७ किलो वजन उचलले. अशा प्रकारे तिने एकूण २०० किलो वजन उचलून इतिहास रचला. यापूर्वी ऑक्टोंबरमध्ये झालेल्या नॅशनल गेम्समध्येही ती दुखापतीसह सहभागी झाली होती. 

मीराबाईचा जन्म इंफाळपासून २२ किमी दूर असणाऱ्या नोंगपोक काकचिंग गावात गरीब कुटुंबात झाला होता. तिच्या कुटुंबात सहा भावंड होती. लहानपणापासूनच तिला तिरंदाजी मध्ये करिअर करायचं होतं, पण आठव्या इयत्तेत असताना तिने वेटलिफ्टिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. इम्फाळची वेटलिफ्टर कुंजराणीला पाहून आपणही वेटलिफ्टर व्हावं, अशी ईच्छा मीराबाईला झाली. मीराबाईच्या जिद्दीपुढे आई-वडिलांनाही माघार घ्यावी लागली. २००६ मध्ये तिने सराव सुरू केला तेंव्हा लोखंडाचा बार नसल्यानं ती बांबूच्या बारनं सराव करत असे. जेवणात चिकन आणि अंडी लागायची. पण सामान्य कुटुंबात जन्मलेल्या मीराबाईला तेही शक्य नव्हतं. पण यामुळे मीराबाई थांबली नाही. मीराबाईला वेटलिफ्टिंगचं प्रशिक्षण घेण्यासाठी दररोज पहाटे उठून २२ किलोमीटरचा प्रवास करुन प्रशिक्षण केंद्रात जावं लागायचं. तिथून आल्यानंतर पुन्हा शाळेची तयारी आणि शाळेतून घरी आल्यावर अभ्यास यातच संपूर्ण दिवस निघून जायचा. वयाच्या ११ व्या वर्षी मीराबाई अंडर १५ चॅम्पियन होती आणि १७ व्या वर्षी ज्युनियर चॅम्पियन. ज्या कुंजराणी यांना बघत मीराबाईच्या मनात चॅम्पियन बनण्याचं स्वप्न जागृत झालं त्याच कुंजराणी यांचा १२ वर्षं जुना विक्रम मीराबाईने मोडीत काढला, १९२ किलो वजन उचलून. असं असलं तरी प्रवास सोपा नव्हता. कारण मीराबाईच्या आई-वडिलांजवळ पुरेशी साधनसंपत्ती नव्हती. रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र न झाल्यास खेळ सोडावा लागेल, अशी परिस्थिती उद्भवली होती. पण ही वेळ आली नाही. २०१४ च्या ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत मीराबाईने भारतासाठी रौप्यपदक जिंकले होते. या प्रकारातील सुवर्णपदकही भारताच्या खात्यात आले होते. २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये पात्रता फेरीत मीराबाईने तिची आयडॉल असलेल्या कुंजराणीचा पराभव केला आणि ऑलिम्पिकमध्ये आपले स्थान पक्के केले होते. 

मात्र रियो ऑलिम्पिक २०१६ मध्ये तिने विशेष कामगिरी केली नव्हती. रिओ ऑलिम्पिकमध्ये मीराबाईच्या पदरात निराशा आली होती. ऑलिम्पिकसारख्या खेळात प्रतिस्पर्ध्याकडून हार पत्करावी लागली तर वेगळी गोष्ट आहे. पण खेळाडू त्याचा खेळ पूर्णच करू शकला नाही तर ती गोष्ट खेळाडूच्या मानसिक धैर्याला धक्का पोहोचवणारी असते. २०१६ मध्ये मीराबाईबरोबरही असंच झालं होतं. ऑलिम्पिकमध्ये मीराबाई अशी दुसरी खेळाडू होती जिच्या नावासमोर डिड नॉट फिनिश असं लिहिलेलं होतं. जे वजन मीराबाई सराव करताना सहजपणे उचलत असे, तेच वजन ऑलिम्पिक स्पर्धेत उचलताना जणू तिचे हात जखडले होते. त्यावेळी भारतात रात्र असल्यामुळे हे खूप कमी भारतीयांनी बघितलं. सकाळी उठल्यानंतर भारतातल्या क्रीडाप्रेमींनी जेव्हा ही बातमी वाचली तेव्हा मीराबाई त्यांच्या नजरेत व्हिलन ठरली. त्यावेळी मीराबाई चानूला मोठ्या प्रमाणात टीका सहन करावी लागली होती. याकाळात ती नैराश्याचा सामना करत होती. दर आठवड्याला तिला मानसिक तज्ञांकडून उपचार घ्यावे लागले. वेटलिफ्टिंमधून निवृत्त होण्याचाही विचार तिच्या मनात आला होता. मात्र त्यानंतर तिने मागे वळून पाहिलं नाही. नैराश्यावरही मात करुन मीराबाईनं दमदार पुनरागमन केलं. यापूर्वी मीराबाई चानूने२०१७ मध्ये  झालेल्या वेटलिफ्टिंग वर्ल्ड चँपियनशिप मध्ये १९४ किलो (८५ आणि १०९ किलो) वजन उचलून सुवर्ण जिंकले होते .नुकत्याच संपन्न झालेल्या टोकियो ऑलिम्पिक मध्ये मीराबाई चानूने ४९ किलो वजनी गटात वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदकाची कमाई केली होती. मीराबाईने स्नॅच आणि क्लीन अँड जर्कमध्ये एकूण २०२ किलो वजन उचलून आपले ऑलिम्पिक पदक पक्के केले होते. मीराबाईचे हे वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील दुसरे पदक आहे. मिराबाई चानूच्या या यशाबद्दल अभिनंदन! 

- सुरेश मंत्री

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...