मुख्य सामग्रीवर वगळा

मानवी स्थलांतराची समस्या

विविध कारणास्तव आपले राहाते घर किंवा प्रदेश किंवा अगदी आपला स्वदेश सोडून इतर परक्या प्रदेशामध्ये वास्तव्यास जाणे हा प्रकार मनुष्यप्राण्यांमध्ये अगदी इतिहासपूर्व काळापासून होत आला आहे. शास्त्रीय परिभाषेमध्ये या प्रकारास ‘स्थलांतर करणे’ असे म्हणण्यात येते. स्थलांतर’ हा माणसाच्या आजवरच्या इतिहासात कायमच महत्त्वाचा घटक राहिला आहे. अवघ्या मानव जातीचा इतिहास हा स्थलांतराचा इतिहास राहिलेला आहे. म्हणजे, दीड-दोन लाख वर्षांपूर्वी आपला पूर्वज असलेल्या आदिमानवाने अस्तित्व टिकवून ठेवण्याच्या इर्षेपायी गुहेबाहेर पाऊल टाकलं, ते आजही थांबलेले नाही. स्थलांतराची ही प्रक्रिया मानवाच्या जन्मापासून अव्याहत सुरूच आहे. आजवरच्या इतिहासात स्थलांतराच्या या अव्याहत प्रक्रियेला चालना देणारे, रोखणारे अनेक टप्पे येऊन गेले आहेत. म्हणजेच, साधारण दहा-एक हजार वर्षांपूर्वी जेव्हा भटके जगणे टाळून माणूस शेती करू लागला तेव्हा, टोळ्यांनी स्थलांतर करणारा माणूस काही काळापुरता स्थिरावला. मग दळणवळणाची साधने विकसित होत गेली, महासाथी, युद्धे, महापूरासारख्या आपत्ती कोसळत गेल्या तशी स्थलांतराची प्रक्रिया वेगाने पुढे सरकत गेली. युरोपात प्रबोधनाचे पर्व अवतरले. पाठोपाठ सरंजामशाही लयास जावून भांडवलशाही उदयास आली, औद्योगिक क्रांती झाली, तसे ग्रामीण ते शहरी असा स्थलांतराचा प्रवाह वेगवान झाला. एकोणीस आणि विसाव्या शतकात साम्राज्यवादी सत्तांच्या विस्तारवादी धोरणांनी सक्तीच्या स्थलांतराचा प्रवाह रुजवला केला. विसाव्या शतकाच्या प्रारंभी पहिले आणि दुसरे महायुद्ध, भारताची झालेली फाळणी या घटनांनी समूहांच्या स्थलांतराला धग दिली. पुढचा स्थलांतराचा टप्पा आखाती युद्ध आणि त्याला समांतर जागतिकीकरण, उदारीकरण या प्रक्रियांमुळे आला. मधल्या काळात हे विश्व जणू खेडे झाल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवले. परंतु एकविसावे शतक उजाडता-उजाडता पुन्हा एकदा जगाची पावले माघारी पडू लागली. आदीम काळापासून आजच्या कोरोना संकटापर्यंत माणसे सतत एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जात राहिली आहेत. कधी संकटापासून दूर जाण्यासाठी तर कधी पोटाची खळगी भरण्यासाठी. या स्थलांतर करणाऱ्या माणसांशी तेथील मूळच्या लोकांसोबत झालेल्या संघर्षाच्या आणि सहकार्याच्या कहाण्यांनी माणसाचा इतिहास भरलेला आहे. आज एकविसाव्या शतकात, वाढलेला प्रवासाचा वेग आणि संपर्काची क्रांती यामुळे या स्थलातंराचे नवेनवे पैलू सामोरे येत आहेत. स्थलांतराचे हे गणित समजून घेतल्याशिवाय आता आपल्याला पुढे जाता येणेच अशक्य आहे.

कोणत्याही स्थलांतराच्या अनेक बाजू असतात. राष्ट्र, भाषा, जात/जमात, श्रद्धा, अस्मिता, त्यांचे राजकारण आणि बाजारपेठेवर-अर्थकारणावर प्रभाव टाकणाऱ्या वेगवेगळ्या सामाजिक गुंतागुंती इत्यादी मुद्द्यांवर मूळचे आणि बाहेरचे यांच्यात होणारा संघर्ष आणि नंतरचे जुळवून घेणे या प्रक्रिया वर्षानुवर्षे चालणाऱ्या प्रक्रिया आहेत. अनेकदा समाजातील या स्थलांतराच्या, समाजात मिसळून जाण्याच्या किंवा जुळवून घेण्याच्या प्रक्रिया अनेकदा दुर्लक्षित केल्या जातात. रशिया युक्रेन युद्ध असो की वातावरण बदल असो कधी कुठे भुकंप तर कुठे नवनवीन आजार. पण यासर्वांचा प्रभाव स्थलांतरावर होतो. स्थलांतर हे स्थायी आणि अस्थायी असे दोन्हीही असू शकते. यामागे अनेक कारणे आहेत. युद्ध, असुरक्षा, हवामान बदल, रोजगार या सारख्या गंभीर समस्येमुळे अनेक लोक आपली रहीवासी जागा सोडून दूस-या ठिकाणी स्थलांतरीत होतात. पण जेव्हा ते दुस-या ठिकाणी पोहचतात त्यावेळी त्या ठिकाणचे लोकांना ते ओझे वाटू लागतात. २०२१ मध्ये जवळपास ५.९ कोटी लोकं स्थलांतरीत झाले होते मात्र हे लोकं कोण होते, हे समजून घेणेही तितकेच गरजेचे आहे. हे लोक ते होते की आपला देश सोडत दुस-या देशात स्थलांतरीत झाले किंवा बॉर्डर पार करुन दुस-या देशाच्या बॉर्डरवर राहायला गेले. कोरोना काळात अनेकांचा रोजगार दगावला. त्यामुळे अनेकांनी स्थलांतर केले. मोठ्या शहरातून लोक गावाकडे परतले. कोरोनाच्या काळातील झालेली स्थलांतरे आणि त्या स्थलांतरप्रक्रियेत झालेल्या कामगारवर्गाच्या व त्यांच्या लेकराबाळांना भोगाव्या लागलेल्या हालअपेष्टा या वास्तवाला अधिक गडद करून गेल्या. या काळात लाखो स्थलांतरित मजूर, कामगार शेकडो-हजारो मैल रस्ते तुडवत आपापल्या गावी परतू लागल्याचे दृश्य या देशाने पाहिले. वाहतुकीच्या तुटपुज्या व्यवथेमध्ये होत असलेल्या या स्थलांतराच्या कहाण्यांनी, काहींना थेट १९४७ च्या फाळणीच्या वेळी झालेल्या ऐतिहासिक स्थलांतराची आठवण झाली. स्वातंत्र्योत्तर भारताच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच स्थलांतराची समस्या ही मोठी समस्या आहे याची किमान जाणीव इथल्या समाजाला आणि सरकारला झाली. आता कोरोनाचा धोका संपताच लोक पून्हा शहराकडे स्थलांतरीत होताना दिसत आहेत.

स्थलांतर ही एक गरज झालेली आहे. गावाकडचे लोकं शहरात स्थलांतरीत होत आहेत. सध्या जगाची अर्ध्याहून अधिक लोकसंख्या शहरी भागात राहते आणि येत्या २०५० पर्यंत हे प्रमाण दोन तृतीयांश किंवा ६६ टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेच्या मते प्रत्येक तीस व्यक्तींमध्ये एक व्यक्ती स्थलांतरीत करत असतो. स्थलांतर ही अस्तित्व टिकवून ठेवण्याच्या इर्षेतून स्फुरलेली म्हटली तर नैसर्गिक क्रिया आहे. मात्र गेल्या शतकभरातल्या देशोदेशींच्या नेत्यांनी केलेल्या शत्रूकेंद्री राजकारणामुळे ही प्रक्रिया समस्या बनलेली आहे. मागील काही दशकात आंतरराष्ट्रीय स्थलांतरीत लोकांचीही संख्या वाढली आहे आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सध्या जगाच्या इतिहासात कधी नव्हे ते लोक मातृभूमी सोडून अन्य देशात स्थलांतरित होत आहेत. हे आंतरराष्ट्रीय स्थलांतरित नागरी क्षेत्रांतच राहतात. जागतिकीकरणाच्या या युगात भांडवल, तंत्रज्ञान, मालवाहतूक आणि सेवा व माणसे यांची वाहतूक किंवा स्थलांतर हा महत्त्वाचा भाग ठरला आहे. त्यामुळे नागरीकरण ही समाज, तसेच अर्थव्यवस्थांची परिवर्तनशील प्रक्रिया आहे. त्यामुळे शाश्वत शहरे आणि मानवी वहन या विषयांवर सर्वंकष आणि संतुलित दृष्टिकोनाची गरज आहे. स्थलांतरामुळे शहरांमध्ये नव्या कल्पना, ऊर्जा आणि सांस्कृतिक वैविध्य येत असले, तरी अनियोजित नागरीकरण व स्थलांतरामुळे विकासाचे काही गंभीर प्रश्नही तयार झाले आहेत. सेवापुरवठा आणि राहणीमान यांच्यावर नकारात्मक परिणाम होत आहे. मूळ रहिवासी आणि स्थलांतरित यांच्यातील दरीही दिवसेंदिवस वाढत आहे. ही स्थिती कायम राहिली, तर नागरीकरणात आणखी गंभीर प्रश्न निर्माण होतील. 

-सुरेश मंत्री

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...