दिल्ली-मथुरा ही रेल्वे वेगाने धावत होती.बल्लमगढचे रहिवाशी असलेले चार
मुस्लिम भाऊ दिल्लीहुन ईदची खरेदी करून या रेल्वेने गावाकडे परतत होते.ओखला
स्टेशनवर त्यांच्या डब्ब्यात १५ ते २० लोक चढले आणि त्यांचा या भावांशी जागेवरून
वाद सूरु झाला.त्यांनी जागा देण्यास नकार देताच या लोकांनी त्यांच्याकडे गोमांस
असल्याचा कांगावा करायला सूरुवात केली.या लोकांनी या चारही तरूणांना घेरून बेदम मारहाण
करण्यास सूरूवात केली.मध्ये आलेल्या स्टेशनवर त्यांनी जीव वाचवण्यासाठी उतरण्याचा
प्रयत्न केला पण ते यात अयशस्वी ठरले.कोणीही त्यांना वाचवण्यासाठी पूढे येईना.रेल्वे
पोलीसांचीही मदत मिळाली नाही.यातील जुनैद नावाच्या १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला
तर एकाची प्रकृती गंभिर आहे.नुकतीच घडलेली ही घटना आहे.धर्माच्या नावाचा आधार घेवून
भडकविले की जमाव प्रशुब्ध होतो,मग
जमावाला डोकेच राहत नाही.मग हा जमाव कोणाचीही हत्या करण्यास तयार होतो.आपल्यापैकी
कुणीही अशा जमावाची शिकार होवू शकत.जीव वाचला तर सुदैव अन्यथा जमाव कुठे जीवंत
ठेवण्याच्या दृष्टीने मारहाण करित असतो,कारण ईथे वैयक्तीक जबाबदारी कुणाचीच
नसते.अशा अनेक घटनांची उदाहरणे देता येतील,जे जमावाने मिळून केलेल्या हत्यांचे
प्रकार अलिकडे भारतात वाढत असल्याचे दर्शवितात.
श्रीनगर मध्ये मशिदीच्या बाहेर सुरक्षेसाठी
तैनात असलेल्या डीएसपी मोहम्मद अय्युब पंडित यांना जमावाने मारून टाकले.या लोकांना
ते अनेक वर्षांपासून ओळखत होते.लोकांनी त्यांना मारून टाकल कारण त्यांच्या नावात
पंडित हा शब्द होता.ते नेहमी आपले नाव एम.ए.पंडित असे लिहित असत.मशिदीच्या बाहेर
सुरक्षेसाठी तैनात असताना ते मोबाईलवर कुणासोबत तरी बोलत होते मात्र लोकांना संशय
आला की ते रेकॉर्डिंग करत आहेत.त्यांच्यावर हल्ला करणा-या जमावाने त्यांच्या
नेमप्लेट वर जेंव्हा पंडित असा शब्द बघितला तेंव्हा जमाव जास्तच उग्र झाला.जमावाने
त्यांचा गणवेष उतरविला आणि त्यांना बेदम मारहाण करून त्यांची हत्या केली.पश्चिम
बंगाल मधिल इस्लामपूर मध्ये तीन जण गाईच्या गोठयाबाहेर उभे होते.गावक-यांना वाटले
की,ते जनावरे चोरणारे आहेत.जमावाने समीरुद्दीन,नसीरुल,,नारिस या तीन तरुणांना
घेरून त्यांची हत्या केली.२४ जूनची ही घटना आहे.९ जूनला राजस्थानच्या बाडमेर मध्ये
तामिळनाडूच्या पशुपालन विभागाचे कर्मचारी ५० गाईंच्या वासराची खरेदी करून परतत
होते.खरेदीची सर्व कागदपत्रे त्यांच्याकडे होती,जिल्हाधिका-यांना याची माहिती
होती.एवढे असूनही ५० लोकांचा जमाव त्यांना घेरून मारून टाकतो.त्यांच्या ट्रकला आग
लावून टाकतो,चालकाला मारून टाकतो.बाला बरुगन,करुपैय्या,एन.अरविंदराज या अधिका-यांना मारहाण
झाली.तीन तासांपर्यंत राष्ट्रीय महामार्ग जाम करण्यात आला.झारखंड मध्ये मुलांची
चोरी होत असल्याची अफवा पसरविली गेली.त्यानंतर जागोजागी जमावाने संशय येईल त्या
लोकांची हत्या केली.१९ मे ला तर झारखंड मध्ये दोन ठिकाणी जमावाने सात लोकांची जबर
मारहाण करून हत्या केली.
आपण धर्माच्या आधारे बघा,शहराच्या आधारे बघा,जस
पाहिजे तस बघा,मात्र आपल्याला प्रत्येक जागी असा जमाव दिसून
येईल जो कुणालाही मारू शकतो,कुणाचीही हत्या करू शकतो.अनेक
लोक म्हणतात की,ही एक सामान्य घटना आहे.असे असूही शकते की
त्यांना ही घटना सामान्य दिसते मात्र कुणाला अशा पद्धतीने खुलेआम मारणे ही काही
सामान्य घटना नाही.हा एक मानसिक आजार आहे जो राजकिय कारणांमुळे निर्माण होतो.आपल
मनही म्हणत असेल की,आज हे जे काही प्रकार घडत आहेत ते ठिक
नाहीत.आज जमावाला राजकिय मान्यता मिळत आहे.औपचारिकतेच्या नावावर अशा घटनांची निंदा
करणारी विधाने घटना घडल्याच्या दोन-तीन दिवसानंतर येतात,मात्र
याच्या काही दिवसानंतर जमाव आणखीन कुणाला तरी मारून टाकतो.आपल्याला अस वाटत असेल
की,मला याच्याशी काय देण-घेण?मात्र
आपल्याला हे दिसत नाहीय की,कुणा एकाला मारण्यासाठी आपलेच
आपल्यांचे हत्यारे बनत आहेत.या जमावाला एक राजकिय पाठिंबा असतो कारण जे विष या
जमावाला भडकावत ते राजकिय क्षेत्रातूनच तयार होत आहे.उदया चालून आपलाच कोणीतरी
जमावात सहभागी होवून कुणाची तरी हत्या करून येईल.यासाठीच आपल्या जवळचा कुणीतरी
खुनी होण्यापूर्वीच सावध व्हा.कधी एखादया महिलेला चेटकीन समजून जमाव तिची हत्या
करत तर कधी कुणाला चोर समजून जमाव त्याची हत्या करतो.आपल्या आत दडपलेली हिंसा
कोणत्या-न-कोणत्या रुपाने बाहेर येते.एकाच्या भांडणात अनेक जण सहभागी होतात आणि
त्याची हत्या करतात.शहरात तर थोडासा वाहनाला धक्का लागला नाही की,लोक एकमेकांची कॉलर पकडतात.आपल्यात संयम नावाची गोष्ट आता उरलेली नाही.
आपल्या मध्ये असणा-या या
असहनशिलतेचा काही लोक गैरफायदा घेवू ईछीत आहेत.त्यांना आपल्या सारखीच लोक हवीत.लोकांचा
जमाव असाच सहज तयार होत नाही.जेंव्हा आपल्याला भडकविले जाते,अनेक प्रकारची खोटी ऐतिहासिक तथ्यं गळी
उतरविली जातात तेंव्हा कुठे या जमावाच्या आगीत आपल्यापैकीच काही जण उडी
मारण्यासाठी तयार होतात.आपण गलिच्छ राजकारणाची शिकार बनत चाललो आहोत.जे अशा प्रकारच्या
हत्येत सहभागी आहेत ते तर मूर्ख बनवले गेले आहेत मात्र जे अशा हत्यांवर मौन
ठेवण्याची कारणं शोधत आहेत ते भावी खूनी बनण्याच्या तयारीत आहेत. कृपया करून
स्वत:ला अशा जमावापासून दूर करा.
भारतात गाईच्या नावावर सुरू
झालेल्या राजकारणावरून जमावाने आत्तापर्यंत काही मुस्लिम तरुणांचा जीव घेतला
आहे.यामुळे या जमावाच धाडस आता एवढ वाढले आहे की,ते लहान मुलांच्या चोरीच्या आरोपावरून उत्तम आणि मंगेश कुमार सारख्यांचा
जीव घ्यायलाही मागे पूढे पाहत नाहीत.धर्माच्या नावावर लोकांना भडकविण्याचे प्रकार
घडत आहेत.मग तयार झालेला हा जमाव कधी मुस्लिम तरुणांना मारण्याच्या नावावर हिंदू
तरुणांना खूनी बनवित आहे तर कधी हिंदू तरुणांना मारण्याच्या नावावर मुस्लिम
तरुणांना.हे प्रकार केवळ एखादया राज्यापर्यंत मर्यादित राहिलेले नाहीत तर याची
कक्षा आता वाढत आहे.हे जमावतंत्र आता धोकादायक बनत आहे.जमावाने केलेल्या हत्येच्या
प्रकरणात आजपर्यंत तरी कुणाला मोठी शिक्षा झालेली नाही.आपली मुले अशा समाजात मोठी
होत आहेत जिथे जमावाने केलेल्या हत्येची साधी निंदा ही होत नाहीय,मरणा-यांचा धर्म बघून लोक गप्प बसणे पसंद करतात,तिथे
आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित नाहीय.दंगली घडत असताना हिंसा करणारा लोकांचा गट
हा एक जमावच असतो जो राजकिय स्वार्थासाठी राजकारण्यांनी लोकांना भडकावल्यामुळे
तयार झालेला असतो.गोध्रा येथील झालेले हत्याकांड हे अशाच जमावाच्या उद्रेकाचे
उदाहरण म्हणता येईल.समाजात व्हाटसअॅप सारख्या सोशल मिडियातून ठराविक समाजाच्या
विरोधात विष पेरणारे मेसेज सतत पसरविण्याचा कारभार केला जात आहे.असे कितीतरी मेसेज
मग आपणही अजाणतेपणी फॉरवर्ड केले असतील.याचा परिणाम काय होवू शकतो याची कदाचित
आपल्याला जाणिव नसते.या विषामुळे कुठेही जमाव तयार होवू शकतो आणि तो कुणाचीही
हत्या करू शकतो.त्यामुळे आपण असा जमाव तयार होण्यासाठी कारणीभूत होण्यापासून किंवा
जमावाचा भाग होण्यापासून सावध राहिलेले बरे.
-सुरेश मंत्री,धारूर

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा