भारत हा जगातील श्रीमंत देशापैकी एक आहे, असे जर कोणी सांगितले तर त्यावर विश्वास बसणार नाही. पण वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने नुकताच एक अहवाल जारी केला आहे. तो पाहता भारतात असलेल्या सोन्यामुळे भारत नक्कीच जगात श्रीमंत देशातील एक आहे, असे म्हणता येणार आहे. कारण जगात सर्वाधिक सोने भारतीयांकडे आहे. आकडेवारीचा विचार केल्यास भारतीयांकडे तब्बल २१,७३३ टन सोने आहे. इतर देशांच्या तुलनेत हे सर्वाधिक आहे. त्यामुळे भारतीयांना सोन्याचे किती आकर्षण आहे, याचा अंदाज येतो.
सोनं ! पिवळंधम्मक, झळाळतं, बावनकशी सोनं ! काळ बदलला, पिढय़ा बदलल्या, जगणं बदललं पण सोन्याला असलेलं महत्त्व कमी झालं नाही. वस्तुतः
मानवजातीला असणा-या सोने जड जवाहीर्यांसारख्या चकाकत्या वस्तुंच्या आकर्षणाचे
रहस्य मानववंशास्त्राला अद्यापी पुर्णतया उलगडले नसावे. बाकी जगातल्या लोकांना
सोन्याचे वेड नसतेच असे नाही पण त्यात संपत्ती प्रेम अधिक आहे, भारतीयांच्या सुवर्ण प्रेमाचे स्वरुप आभूषण प्रेमाचे असावे. आपल्या देशात
सोन्याचे वेड आणि परंपरा फार पूर्वीपासून आहे. सोने म्हणजे
भारतीयांचा विशेषत: महिलांचा आवडता विषय. जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतीय
सोन्यावर अधिक प्रेम करतात. भारतीयांचे आणि त्यातही भारतीय स्त्री आणि
त्यानंतर भारतीय अदृश्यस्रोतोद्गम सुवर्णप्रदर्शक पुरुषधनींचे ही पिवळ्या चकाकत्या
धातूवर एवढे प्रेम एवढे वरचढ आहे की सोन्याच्या बाजारपेठेतील जागतीक किमतीची चढ
उतार भारतातल्या लग्नांच्या मोसमावर ठरते, आणि सोन्याने तुम्हाला वेडे
केले आहे टिकेनी म्हटले तरीही, भारतीयांना आपल्या
पाठीवर शाबासकीची थाप पडल्यासारखे कौतुक वाटते. भारतीयांना सोनं
खास प्रिय आहे यात वादच नाही. घरोघरी गृहिणी
सोन्याच्या दागिन्यांची हौस जपतात. सोन्याचे दागिने पिढ्यान् पिढ्या वापरले जातात, जपले जातात. लग्नासारख्या मोठ्या समारंभापासून छोट्या
कार्यक्रमापर्यंत सोन्याचे दागिने घातल्याशिवाय महिलांची हौस फिटत नाही. भारतात विविध सण, परंपरा आणि लग्न समारंभात सोन्याचे दागिने विकत घेण्याची प्रथा आहे.
त्यामुळे सातत्याने अनेकजण विविध कारणांनी सोन्याची दागिने खरेदी करत असतात.
त्याशिवाय सोन्याचे दागिने खरेदी करणे ही सुरक्षित गुंतवणूक समजली जाते. सोन्याच्या
खरेदीकडे ग्राहकांचा नेहमीच कल राहिला आहे. सोने तारण ठेवून कर्ज घेणाऱ्यांचे प्रमाणही
भारतात मोठे आहे. त्यामुळेच त्यात समाजातील सर्वच स्तरांमध्ये सोने
खरेदीकडे ओढा असल्याचे दिसून येते.
ऐतिहासिक काळापासून जागतीक व्यापारात निर्यात करण्याच्या
बदल्यात भारतीय व्यापारी आणि जनतेने इतर वस्तु घेण्यापेक्षा सोने घेण्यासच
प्राधान्य दिले असावे. भारतीय जनतेची सोन्याची मागणी पुर्ण करु शकेल इतपत प्रमाणात
सोन्याच्या खाणी भारतात बहुधा इतिहासात सुद्धा राहील्या नसाव्यात, तरीही भारतीय एवढे सोने मिळवत आणि बायकांना आणि देवांना दागिन्याने मढवत
कि अफगाणी लूटारुंनी भारतावर सातत्याने हल्ले केले. बाबराचे आत्मचरित्र
र्रेकॉर्डेड आहे आणि तो त्यात भारतात सोन खूप आहे ते मिळवण्यासाठी भारतावर स्वारी
करु इच्छित असल्याचे स्पष्ट नोंदवले आहे. अर्थात वर म्हटल्याप्रमाणे अफगाण
लुटारुंचे सुवर्ण प्रेमाचे स्वरुप संपत्ती प्रेमाचे राहीले असावे. अगदी ब्रिटिश
इस्ट इंडीया कंपनीच्या उत्तरार्धापर्यंत त्यांना त्यांच्या मालाचा मोबदला असो का
राजे लोकांचा कर असो तो सोन्याच्याच स्वरुपात चुकवावा लागत असे, आणि भारतीयांच्या सुवर्णप्रेमाने ब्रिटीशही हवालदिल होत.
जोपर्यंत भारत
निर्यात अधिक होती, आयातीची गरज नव्हती तोपर्यंत चालुन गेले, वसाहत-उत्तर काळात भारताची निर्यात कमी झाली आणि इतर आयात वाढली पण
त्यासोबत सोन्याची आयात सातत्याने चालत राहीली म्हणजे परदेशात विकुन निर्यातीचा
पैसा मिळवून भारतीय लोक सोन्याची आयात करत होते. आजही देशात सर्वाधिक सोने हे विदेशातून आयात केले जाते. जगात वर्षाकाठी होणा-या
सोने खरेदी मध्ये भारत आणि चीन हे दोन देश आघाडीवर आहेत. या दोन्ही देशांतर्फे एकूण
जागतिक सोने खरेदीच्या ५७ टक्के सोने खरेदी केले जाते. भारतात एकूण सोन्याच्या
आयातीपैकी ४४ टक्के सोने स्वित्झर्लंडमधून आणि ११ टक्के संयुक्त अरब अमिरातीमधून
खरेदी केले जाते. २०२१-२२ मध्ये देशाची दागिने आयात ५० टक्के वाढली असून ३९ अब्ज
डॉलर्सवर गेली आहे. रिझर्व बँकेने ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीत डेफिसिट म्हणजे
व्यापार घाटा वाढून २३ अब्ज डॉलर्सवर गेल्याचे म्हटले आहे. एप्रिल २०२१ ते
फेब्रुवारी २०२२ मध्ये देशात ८४२.२८ सोने आयात केले गेले आहे. भारतात सध्या सोन्याच्या तीन खाणी
आहेत - कर्नाटकाच्या हुट्टी आणि उतीमध्ये आणि झारखंडच्या हिराबुद्दिनी इथं. गेल्या
काही वर्षांपासून या तीनही खाणींमधलं उत्खनन कमी झालं आहे. त्यामुळे भारताला आता
सोनं आयातीवर अवलंबून राहावं लागतं. सोन्यासाठी असणारे हे परावलंबित्व लवकरच बदलणार
असून सोन्याच्या उत्खन्नामध्ये आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने भारतीय सुवर्ण
उद्योगाने एक भक्कम पाऊल टाकत तब्बल २० टन सोन्याच्या खोद कामाची तयारी सुरू केली
आहे.
सोन्याच्या साठ्यात देशभरात वाढ होत राहिल्याने भारत जगातील सात
प्रगत देशांच्या सोन्याच्या साठ्यापेक्षाही पुढे असल्याचे दिसून येत असल्याचा अहवाल
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने दिला आहे. अमेरिका (८१३३), जर्मनी (३३८२), इटली (२४५१), फ्रान्स (२४३६), रशिया (२२९८), चीन (१९४८) सिंगापूर (१२७) टन
इतका सोन्याचा साठा या सातदेशांजवळ आहे. या सातही देशांच्या सोन्याच्या साठ्याची
आकडेवारी एकत्र केली तरी भारतात असलेल्या सोन्याच्या साठ्याच्या आकडेवारीपेक्षा ती
कमीच आहे. भारतावर कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात
खर्चही वाढत आहे. यातून भारतीयांचा दरडोई कर्जाचा बोजा वाढत आहे, असे असले, तरी भारतात असलेल्या सोन्याच्या
किमतीचा विचार केला, तर भारतावर जेवढा कर्जाचा बोजा आहे, त्या कर्जाच्या रकमेपेक्षाही सोन्यातून अधिक रक्कम मिळू शकते, एवढे देशात सोने आहे, असे या अहवालात नमूद
करण्यात आले आहे.
- -सुरेश मंत्री.
.jpg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा