नविन शैक्षणिक वर्षाची सुरुवात
नुकतीच झाली होती. मी शाळेत नविन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची ओळख करुन घेत
होतो. प्रत्येक जण आपली ओळख करुन देत होता. एका विद्यार्थीनीने आपले नाव ‘नकोशी’ असल्याचे सांगितले. हे नाव ऐकताच
माझ्या मनावर एकप्रकारे आघातचं झाला.वदिवसभर माझ्या मनात विचार येवू
लागला,व“का बरे तिचे नाव नकोशी ठेवले असेल ? इतर
दूसरे चांगले नाव तिच्या पालकांना का नाही सुचले ?”
दुस-या दिवशी मी तिला बोलावून तिची कौटुंबीक माहिती जाणून घेतली.
तिला दोन मोठ्या बहिणी होत्या, तिचा क्रमांक तिसरा
होता. तिसरीही मुलगीच झाल्याने तिच्या घरातील काहींनी तिचे नामकरण संस्कार
करण्याअगोदरच तिला ‘नकोशी’ म्हणुन हाक मारायला सुरुवात
केली होती. तिच्या आई-वडिलांची परवानगी न घेता घरातील एका वडिलधा-याने तिचे नाव
शाळेत प्रवेश देताना नकोशी असेच टाकले होते. मी विचार केला ‘आता हि लहान आहे म्ह्णून तिला या नावा मागचा हेतू कळत नाही मात्र हि मोठी
झाल्यावर हिच्या मनावर किती आघात होईल ? आपण तिचे नाव
बदलायचे.’
मी तिच्या घरी जावून तिच्या पालकांची भेट घेतली. तिचे नाव बदलण्याचा
आग्रह केला. तिच्या वडिलांनी सांगितले की, घरातील
काहींच्या संकुचीत मनोवृतीमुळे तिचे नाव असे शाळेत टाकण्यात आले. आता लोकही
आम्हाला नावे ठेवत आहेत. तिचे नाव बदलण्याचाही आम्ही तिच्या पुर्वीच्या शाळेत
जावून प्रयत्न केला, मात्र कोणी योग्य मार्गदर्शनच केले
नाही. आता तुम्हीचं काय ते करुन तिचे नाव बदला. आमची काहीचं हरकत नाही. मी ताबडतोब
मुख्याध्यापकांशी चर्चा करुन तिचे हजेरी पटावरुन नाव बदलण्याचा प्रस्ताव तयार करुन
जिल्हा शिक्षणाधिका-यांकडे पाठवून दिला.
हि झाली एक नकोशी, अशा कितीतरी
सावित्रीच्या लेकी महाराष्ट्रात नकोशी / नकुशा या
नावाने शिक्षण घेत आहेत. त्यांना याच नावाने जगावं लागेल. नकोशी म्हणजे नको असलेली. जणू त्या
मुलीचे आई–वडिल देवाकडे म्हणतात ‘नको रे देवा नको’. एकदा का मुलीचे नाव नकोशी ठेवले की
तिचे कुटुंब व सर्व गाव तिच्याकडे तुच्छ नजरेने बघायला लागते. अशा मुलींनी आपले
नाव सांगितले तर लोक हसतात, त्यामुळे या मुलींना त्यांचे नाव सांगण्यासही लाज वाटते. काही वेळा नकोशी
ऐवजी नकुशा असेही नाव ठेवले जाते. महाराष्ट्रात हे नाव ग्रामीण भागात प्रामुख्याने
ठेवलेले दिसून येते.
ज्यांना तिसरी किंवा चौथी मुलगीच झाली
आहे असे पालक तिचे नाव नकोशी ठेवतात. एकप्रकारे हे अपत्य आपल्याला नको
होते, आम्हाला
मुलाची अपेक्षा होती असे ते या द्वारे व्यक्त करतात. एक प्रकारे ती तिच्या कुटुंबाकडुन
नाकारली जाते. ब-याच जणांनी हे नाव ठेवल्यानंतर
पूढचे मुलं मुलगा झाल्याचा दावा केला आहे. काही वेळा दुसरीही मुलगीच झाली तर
त्यांचे शेजारी–पाजारी किंवा घरातील वयस्कर माणसे हे नाव ठेवण्यास प्रवृत्त करतात.
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात हे नाव मोठया प्रमाणावर दिसून आले आहे.
नवे बाळ जन्माला आल्यानंतर पाचवी, शष्ठी
व बारसे हे विधी असतात. यातील सर्वात आकर्षणाचा कार्यक्रम असतो तो म्हणजे बारसे.
यात बाळाचे नामकरण केले जाते. आपल्याकडे मुलगा झाल्यावर त्याचे बारसे मोठा
कार्यक्रम घेवून केले जाते. नातेवाईक, गावातील महिलांना
बोलावले जाते. त्यांना खास जेवण देले जाते. मात्र मुलगी झाली की हा उत्साह न जानो
कोठे निघून जातो. मुलीच्या नशिबी असे बारसे येत नाही. नकोशी किंवा नकुशा हे नाव
ठेवताना तिच्या बारश्याचा कार्यक्रमचं आयोजीत केला जात नाही. कसलाही नामकरण सोहळा
न करता तिला या नावाने हाक मारायला सुरुवात होते.
१९९४ मध्ये महाराष्ट्रात लिंग परिक्षणावर बंदी आणणारा कायदा करण्यात
आला तरीही आज स्थितीला स्त्री–पुरुष गुणोत्तरात मोठी तफावत दिसून येते. मुलींची
संख्या मुलांच्या तुलनेने फार कमी असलेली दिसून येते. जगातील इतर देशात हे प्रमाण
५० : ५० च्या जवळपास आहे. भारतीय
मनोवृत्तीत मुलाला प्रथम दर्जा दिला जातो. मुलीवर केलेला खर्च, तिचे शिक्षण
तिच्या आई–वडिलांसाठी भावी काळात उपयोगी न होता तो तिच्या नव-याच्या उपयोगी येतो
असा विचार केला जातो. त्यामुळे बरीच पालक तिच्या आरोग्यावर खर्च करणे, तिला उच्च शिक्षण देणे टाळतात. या उलट आपल्याकडे खूप संपत्ती आहे त्याला
वारस हवाचं. मुलगा जर नाही झाला तर हि सर्व संपत्ती तिच्या सासरच्यांना मिळेल असा
विचार केला जातो.
हिंदू संस्कृतीत धार्मिक समजही
मुलाला झुकते माप देते. आई–वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यविधिच्या वेळी अग्नी
देण्यासाठी मुलगा हवाचं. मुलाच्या हाताने अग्नी दिल्याशिवाय मोक्ष मिळत नाही, दशक्रियाविधी
पूर्ण होत नाही असा समज आहे. साहजिकच मुलीपेक्षा
मुलगाच हवा असा हट्ट धरला जातो.
ज्या स्त्रीयांना त्यांच्या लहानपणी त्यांच्याकडे साफ दूर्लक्ष झाल्याचा अनूभव आला
त्यांना मुलगी पोटी जन्माला यायला नको असे वाटते. मुलगी व्हावी अशी प्रबळ ईच्छा
निर्माण होते मात्र ती पहिला मुलगा असल्यानंतरचं.
एकीकडे महाराष्ट्राचे नाव
स्त्री–भ्रुण हत्या, हुंडाबळी, बलात्कार, स्त्री अत्याचार अशा प्रकारांनी बदनाम झाले आहे. लिंग परिक्षणावर बंदी असताना
परराज्यात जावून लिंग परिक्षण करणारे काही कमी नाहीत. काही दिवसांपुर्वी माझ्या
शेजारी राहणा-या गृहस्थांना दुसरीही मुलगीच झाली. ते तिला बघायलाही गेले नाहीत उलट
नकोशी झाली म्हणुन पत्नीला हिणवायला सुरुवात केली. मुलगा किंवा मुलगी होण्याला पुरुष
जबाबदार असतो हे शास्त्रीय दृष्टया सिद्ध होवुनही पुरुषांची मानसिकता काही बदलायला
तयार नाही. ब-याच ठिकाणी महिला सुद्धा मुलगाचं व्हावा असा अट्टहास करताना दिसतात. भारतातील काही राज्यात अतिक्षय
भयानक अवस्था आहे. हरियाणामध्ये मुलीचा जन्म होणे म्हणंजे जणू शापचं समजला जातो.
तिथे प्रत्येकी एक हजारा मागे एकशे तीस मुलींना मारुन टाकले जाते. अशा परिस्थितीत वाढलेली साक्षी
मलिक भारताला कुस्ती मधे कास्य पदक मिळवुन देते. भारताला ऑलम्पीक स्पर्धेत यावेळी
फक्त दोनच पदक जिंकता आली, तिही मिळवून दिली पि. व्ही.सिंधू, साक्षी मलिक
या मुलींनेच. या अगोदर मुलींकडुन माहेरून सोने आणण्याची अपेक्षा करणा-या भारतीय
मनोवृतीने पहिल्यांदा यांच्याकडून सुवर्ण पदक आणण्याची अपेक्षा केली. कुणी तरी खरे
म्हटले आहे ‘करते रहे गुनाह हम, केवल बेटे के शौक मे. कितने मेडल
मार दिए, जीते जी ही कोख मे’ समाजाची विचार धारा बदलते आहे
मात्र खूपच मंद गतीने. माझे एक नातेवाईक आहेत. त्यांना
एकुण अकरा मुली आहेत. केवळ मुलाच्या अपेक्षेमुळे त्यांचं कुटुंब एवढ मोठ झालं. माझ्या जातीत त्या
काळी मुलीचं लग्न करणं म्हणजे मुलीच्या बापाच्या जिवाला घोर, अशा परिस्थितीत त्यांनी सर्व मुलींची लग्न लावून दिली. यासाठी त्यांना
कोणत्या दिव्यातून जावे लागले असेल ते देवंच जाणे. आता ते वयोवृध झाले आहेत, त्यांचा
त्यांच्या मुली अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळ करतात.
अगदी अलीकडच्या काळात बीड जिल्हा
स्त्री- भ्रुण हत्येमुळे बदनाम झाला. अनेक डॉक्टरवर पि. एन. डी. टी. कायद्यानूसार
कारवाई करण्यात आली. याचं जिल्ह्यात वैद्यकीय व्यवसाय करणा-या अनेक दांम्पत्याना
केवळ मुलीचं आहेत याकडे आपण डोळसपणे बघायला हवं. इतकेच काय अनेक मोठया राजकीय
नेत्यांनाही केवळ मुलीचं आहेत.
समाजातील ब-याच जणांना फक्त मुलीचं
असतात. त्यांच्याकडे वैचारीक परिपक्वताही असते.
ते आपले यात आनंदी असतात मात्र
ज्यांचे यांच्याशी काही देणे–घेणे ही नाही अशे काही लोक मात्र यामुळे विनाकारन
दु:खी होतात. अशे लोक त्यांच्या कडे जावून आपण मुलासाठी आणखीन एक चान्स घ्यायला
हवा असा सल्ला देताना आपण पाहतो. (मलाही दोन्ही मुली आहेत त्यामुळे
मी हे अनुभवले आहे)
असो, ब-याच सामाजिक संस्थांनी पुढाकार घेवून
नकोशी / नकुशा या सारख्या नावात बदल करुन दिल्याचे मी वृत्तपत्रा, वाहिन्यांवर बघितले आहे. मला आलेल्या अनुभवावरुन त्यांनाव या साठी किती कष्ट घ्यावे लागले
असतील याचा विचार येतो. या पूर्वी अशी नावे सहसा शाळास्तरावरच बदलून दिली जात. आता मात्र विद्यार्थ्यांची नावे
ऑनलाईन करण्यात आलेली आहेत. त्यामुळे विहीत नमुन्यात याचा
प्रस्ताव जिल्हा शिक्षण विभागाकडे दाखल करावा लागतो. जर मुलीचे १० वी नंतरचे
शिक्षण झाले असेल तर अगोदर राजपत्रातून नाव बदलून आणावे लागते. नावात बदल
करण्यासाठी मुलीचा शाळेचा निर्गम उतारा, नावात चूक झाल्याचा कोणताही एक पुरावा जसे
आधार कार्ड / राशन कार्ड, पालकाचे
नोटरी केलेले शपथ पत्र व सर्वात महत्वाचे म्हणजे राजपत्रातुन नावात बदल केल्याचे
पत्र. कुणी सामाजिक जाणिवेतून ही सगळी कागदपत्रे जमा करुन प्रस्ताव जिल्हा शिक्षण
विभागाकडे दाखल केलाचं तर तिथे आर्थिक झळ बसल्याशिवाय कामच होत नाही. जिल्ह्याच्या
ठिकाणी यासाठी अनेक वेळा चकरा माराव्या लागतात. प्रशासनातील ढिम्म कर्मचारी याकढे
सामाजिक भावनेने बघतिल असे नाही. हा खर्च साधारणता: दोन
ते तीन हजारापर्यंत जातो. एकंदरीत यासाठी वेळ व पैसा खर्च करावा लागतो त्यामुळे
बरेच जण अर्ध्यातच हा विचार सोडून देतात.
सातारा जिल्ह्यात काही वर्षापूर्वी एका सामाजिक संस्थेने सर्व्हे करून अशा
अनेक नकोशी शोधून काढल्या होत्या. सातारा जिल्हा परिषदेने या मुलींची नावे बदलून
दिली होती. यासाठी खास सभारंभ आयोजीत करुन या मुलींना नवीन नावाचे प्रमाणपत्र
देण्यात आले. मात्र या पैकी काही मुलींच्या
पालकांचे म्हणणे होते की, नुसते नावात बदल करुन काय उपयोग ? आम्हाला
केवळ मुलीचं आहेत म्हणुन आम्हाला शासकिय सूविधा मिळायला हव्यात. काहींनीतर मुलीचे
रेकॉर्डवर नाव बदलूनही घरात मात्र तिला नकोशी म्हणुनच हाक मारायचे सोडले नाही असा
हा आपला समाज. आपले पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी
यांनी ‘बेटी बचाव’ योजना हाती घेतली आहे हा चांगला उपक्रम आहे. समाजाची मानसिकता
या मुळे बदलायला निश्चितच मदत होईल मात्र यासाठी खूप काळ लागे, आणखीन एक शतक
म्हटले तरी यात काही नवल वाटण्यासारखे काही नाही. शाळेच्या अभ्यास्क्रमातुन एकीकडे
स्त्री–पुरुष समानतेचे मुल्य विद्यार्थ्यात रुजवण्याचा प्रयत्न होत असताना अशा
प्रकारची नावं हजेरी पटावर असनं याला तडा देणारी गोष्ट
नाही का ? यासाठी आपल्याकडे काही पर्याय आहेत –
1) जरी आपल्या मुलीचे नाव काय ठेवायचे हा तिच्या पालकाचा हक्क असला
तरी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने असे आदेश सर्व शाळांना द्यावेत की, कोणत्याही
पालकाकडुन नकोशी / नकुशा अशा प्रकारची नकारात्मक भावनेची नावे स्विकारु नयेत. अशा
पालकांचे शिक्षकांनी समुपदेशन करुन त्यांचे मतपरिवर्तन करावे.
2) शालेय शिक्षण विभागाने असे आदेश द्यावेत की, शाळेमध्ये
अशी नावे असतील तर त्याची माहिती तात्काळ कळवावी व अशा मुलींचे नावात बदल करण्याचे
प्रस्ताव ताबडतोब जिल्हा शिक्षण विभागाकडे दाखल करावेत.
3)
नावात बदल करण्यासाठी इतर नावाचा पुरावा द्यावा लागतो. नकोशी / नकुशा अशी
जाणिवपुर्वक नाव ठेवलेल्या पालकांकडे इतर नावाचा पुरावाच असू शकत नाही. त्यामुळे
राजपत्र व इतर नावाचा पुरावा असण्याची अट या बाबतीत शिथिल करावी.
नुसत्या एका नकोशीचे नाव बदल
करण्याने मला किंवा इतर सुजान नागरिकांना समाधान लाभणार नाही तर अशा
अपप्रवृत्तींना कायमचा आळा बसेल तेंव्हाच खरे समाधान लाभेल.
-सुरेश मंत्री

Khup chhannnn
उत्तर द्याहटवा