मुख्य सामग्रीवर वगळा

पुलवामावरुन पुन्हा रणकंदन

काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक हे त्यांच्या बेधडक विधानांसाठी परिचित आहेत. दिल्लीच्या सीमेवर वर्षभर चाललेल्या शेतकरी आंदोलनावरून त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत खटके उडाले होते, ज्याची जाहीर वाच्यता त्यांनी न घाबरता माध्यमांसमोर केली होती. सत्यपाल मलिक यांनी मोदी सरकारबाबत  नुकतच एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. २०१९ साली काश्मीरच्या पुलवामामध्ये केंद्रीय राखीव सुरक्षा बलाच्या ताफ्यावर झालेला हल्ला हा सुरक्षा यंत्रणेची निष्क्रियता आणि निष्काळजीपणाचा परिणाम होता, असा आरोप मलिक यांनी केला. पाकिस्तानातून ३०० किलो आरडीएक्स एखाद्या ट्रकने येतं आणि ते जम्मू-काश्मीरमध्ये १० ते १५ दिवस फिरत राहातं तरीही गुप्तचर यंत्रणांना समजलं नाही असा दावा त्यांनी केला. पुलवामा हल्ल्याच्या वेळी पंतप्रधान मोदी यांनी गप्प राहण्याचे निर्देश दिले होते, असा गौप्यस्फोट एका खाजगी पोर्टल दिलेल्या दिलेल्या मुलाखतीदरम्यान सत्यपाल मलिक यांनी केला आहे. सत्यपाल मलिक यांनी मुलाखतीत म्हटले आहे की, सीआरपीएफने ताफा घेऊन जाण्यासाठी गृह मंत्रालयाकडे पाच विमानांची मागणी केली होती. परंतु गृह मंत्रालयाने सीआरपीएफला विमान देण्यास मान्यता दिली नाही. विमान उपलब्ध झाले असते तर हल्ला झाला नसता. हल्ल्याच्या संध्याकाळीच मी पंतप्रधान मोदींना सांगितले होते की, आमच्यामुळे शहीद जवानांचे प्राण गेले. यावर पंतप्रधानांनी मला शांत राहण्यास सांगितले. त्यांनी हीच गोष्ट राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनाही सांगितली. डोभाल यांनीही त्यांना गप्प राहण्यास सांगितले. या हल्ल्याचा आरोप पाकिस्तानवर जाईल आणि याचा फायदा निवडणुकीत होईल, असे सरकारचे धोरण होते असा मोठा गौप्यस्फोट मलिक यांनी केला आहे. सत्यपाल मलिक यांच्या या दाव्यामुळे देशाच्या राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षांकडून या मुद्यावरुन सरकारला लक्ष्य केलं जाऊ शकतं. 

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू-श्रीनगर महामार्गावरच्या पुलवामा भागात सीआरपीएफच्या जवानांच्या एका ताफ्यावर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा अतिरेकी आदिल अहमद दार याने स्फोटकांनी भरलेल्या गाडीची धडक सीआरपीएफच्या ताफ्यातील बसला दिली होती. या भीषण स्फोटात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. ऐन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ही घटना घडल्यानंतर विरोधकांनी त्यावर बोट ठेवत काही प्रश्न उपस्थित केले होते. पुलवामाचा हल्ला झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळणे अपेक्षितच होते. या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देऊन सरकारने शहीद जवानांना श्रद्धांजली द्यावी, अशी मागणी पुढे येऊ लागली होती. २६ फेब्रुवारी २०१९ रोजी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथे एअर स्ट्राईक करून दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त करत पुलवामाच्या भ्याड हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. या हल्ल्यात जवळपास ३०० दहशतवादी मारले गेले, असे सांगितले जात होते. तत्कालीन परराष्ट्र संबंध मंत्रालयाचे सचिव विजय गोखले यांनी पत्रकार परिषद घेऊन बालाकोट हवाई हल्ल्यात दहशतवाद्यांचे मोठे नुकसान झाले असून दहशतवाद्यांचे प्रशिक्षण केंद्र उद्ध्वस्त केल्याचा दावा त्यांनी केला होता. यानंतर पाकिस्तानकडून दुसऱ्याच दिवशी हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पाकिस्तानच्या या आगळिकीला भारताने तात्काळ चोख उत्तर दिले. भारताच्या मिग २१ या लढाऊ विमानाचे वैमानिक विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानचे शक्तिशाली फोर्स एफ-१६ हे लढाऊ विमान पाडून पराक्रम गाजवला. पण दुर्दैवाने विंग कमांडर वर्धमान यांच्याही जेटचे नुकसान झाल्यामुळे त्यांना पाकिस्तानच्या हद्दीत उतरावे लागले. तिथे पाकिस्तानी सैन्याने त्यांना ताब्यात घेतले. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुखरूप सुटका व्हावी, यासाठी संपूर्ण देश प्रार्थना करत होता. भारतानेही आंतरराष्ट्रीय स्तरावरून पाकिस्तानवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. तब्बल साठ तास पाकिस्तानच्या सैन्याचा छळ सहन केल्यानंतर अभिनंदन वर्धमान यांची १ मार्च २०१९ रोजी सुटका करण्यात आली. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शांती अबाधित राहावी, यासाठी अभिनंदन यांच्या सुटकेला मान्यता दिली. अभिनंदन वर्धमान यांना त्याच वर्षी स्वातंत्र्यदिनी वीरचक्र देऊन सन्मानित करण्यात आले होते. 

पुलवामा हल्ल्याला चार वर्षे झाली असली तरी त्यावरून होणारे राजकारण थांबलेले नाही. सत्यपाल मलिक हे पहिले व्यक्ती नाहीत ज्यांनी पुलवामा हल्ल्यावरून मोदी सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत. याआधी काँग्रेसचे नेते दिग्विजयसिंह यांनीही असेच प्रश्न उपस्थित केले होते. मात्र भाजपाकडून जोरदार टीका झाल्यानंतर काँग्रेस पक्षातूनच दिग्विजय सिंह यांना शांत राहण्याचा इशारा देण्यात आला. २३ जानेवारी २०२३ रोजी दिग्विजय सिंह यांनी एक ट्वीट करत पुलवामा हल्ल्यासाठी वापरण्यात आलेले ३०० किलो आरडीएक्स कुठून आले ? असा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच सीआरपीएफच्या जवानांना एअर लिफ्ट करण्याची मागणी होत असताना त्यांना विमानाने का आणण्यात आले नाही ? असाही प्रश्न त्यांनी त्या वेळी उपस्थित केला होता. अर्थातच भाजपाकडून झालेल्या टीकेनंतर काँग्रेसने दिग्विजय यांचे वक्तव्य वैयक्तिक पातळीवरचे असून पक्षाशी त्याचा काही संबंध नसल्याचे सांगितले. सत्यपाल मलिक यांच्या या गौप्यस्फोटानंतर देशात मोदी सरकार विरोधात संताप व्यक्त केला जात असून राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. पुलवामा हल्ला पूर्वनियोजित होता. सत्यपाल मलिक यांनी केलेलं वक्तव्य हे चुकीचं नसून, हे सत्य आहे, त्या ४० जवानांची राजकीय स्वार्थापोटी हत्या झाल्याचा, गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. २०१९ ला लोकसभा निवडणुकीसाठी सामोरे जाणारे आताचे सत्ताधारी हे निवडणूक जिंकण्यासाठी काहीतरी गडबड करतील, असे माहित होते. विरोधकांनी अनेकदा त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला; परंतु प्रश्न विचारणाऱ्या विरोधी पक्षांना भाजपने देशद्रोही ठरवले. ३०० किलो आरडीएक्स पुलवामामध्ये पोहोचले कसे ? पुलवामाच्या रस्त्यावरुन कधीही सुरक्षाकर्मी प्रवास करत नाहीत. त्यांना सरकारने किंवा एअरफोर्सने विमान का दिले नाही ? की त्या ४० जवानांची हत्या करुन त्याचा राजकीय फायदा उचलण्याचा डाव होता, असे म्हणत राऊत यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. 

- सुरेश मंत्री.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...